बेलसर – बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर सलग अपघातांची मालिका सुरू आहे. 15 सेकंदात दुकानांचा चक्काचूर त्यासोबतच चौकांमध्ये झालेल्या छोट्या मोठ्या अपघातात अनेक जणांनी आपले हात कींवा पाय गमावले आहेत. तर प्रशासन एखादा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हायब्रीड एमबीटी तत्त्वावर बेल्हे पाबळ रस्त्याचे काम चालू आहे. हा रस्ता अष्टविनायक मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही फार वाढत असून एक महिन्यांमध्ये बेलसर ग्रामपंचायत हद्दीत चार ते पाच मोठे अपघात झाले आहेत.
कोथळे चौक येथे दोन तरुणांचे पायी ही मोडले आहेत. बालसिद्धनाथ विद्यालया जवळील रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने दोन व्यवसायिक दुकानांचा चक्काचूर केला. हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. बेलसर गावाजवळ भीम नगर चौक येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने एका तरुणाला उडवले असे अनेक अपघात या रस्त्यावर होत असून रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
गतिरोधक बसवा
बेलसरमध्ये उत्कर्ष मंगल कार्यालयाजवळ, भीमनगर चौक, बालसिद्धनाथ विद्यालय जवळ, कोथळे चौक या अपघात प्रवणक्षेत्रात गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अर्जुनधेंडे, उपसरपंच धीरज जगताप यांनी पूर्व पुण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जेजुरी पोलीस ठाण्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.