पुणे -उन्हाचा चटका वाढताच लिंबू सरबत, ऊसाचा रस पिण्यास नागरिक पसंती देत आहेत. लिंबाला मागणी वाढली आहे. त्यातच आवक घटली आहे. परिणामी, लिंबाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांत लिंबांच्या भावात घाऊक बाजारात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत आहेत.
उन्हाळ्यात घशाची कोरड सुकविण्यासाठी पुणेकरांची पाऊले लिंबू सरबत, रसवंती गृहे आदींकडे वळू लागली आहे. त्याअनुषंगाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज दीड हजार गोणींची आवक होत आहे. दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन हजार गोणींची आवक होत होती. आता बाजारात श्रीगोंदासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून आवक होत आहे. एका गोणीला दर्जानुसार 400 ते 1400 रुपये भाव मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात दहा रुपयांना पाच मिळणारी लिंबू आता दोनवर आली आहेत.