पुणे – मार्केटिंग कॉल्समुळे अनेकजण हैराण होत आहेत. डीएनडी ॅक्टीव्ह केल्यानंतर कंपन्यांकडून साध्या मोबाईलचा वापर करण्यात येत आहे. एखादा क्रमांक ब्लॉक केला, तरी वेगळ्या क्रमांकावरून काॅल्स येत असल्याने त्रासला असाल, तर ग्राहकांसाठी एक खूशखबर! कुणी विनाकारण फोन करून तुम्हाला त्रास देत असेल तर आता ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. केंद्राने नवीन टेलिकाॅम विधेयक आणून ग्राहकांना दिलासा दिला आहे.
सध्याच्या काळात मोबाइल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. दिवसभरात ग्राहकांना बहुतांश अनोळखी क्रमांकाचा सामना करावा लागतो, त्यातले अनेक कंपन्याचे मार्केटिंग काॅल्स असतात. एखाद्या नातेवाइकाने अथवा जवळच्या व्यक्तीने दुसऱ्या कुठल्या क्रमांकावरून फोन केला असेल असे वाटून बरेचसे ग्राहक फोन उचलतात आणि पस्तावतात. गेल्या काही वर्षांत नको असलेल्या कॉलच्या संख्येत प्रमोशन आणि बँकिंग कॉलमध्ये वाढ झाली आहे. यासाठी ‘ट्राय’ने अनेक सूचना दिल्या. मात्र, दूरसंचार कंपन्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.
यापूर्वी, ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एआय फिल्टरच्या मदतीने फसवणूक आणि अनोळखी कॉल्स थांबवण्याचे निर्देश दिले होते. अशा स्थितीत सरकारने कठोरपणा दाखवत नव्या टेलिकॉम बिलमध्ये दंडाची तरतूद केली आहे. यासाठी सरकारने नवा नियम आणला आहे. यात कोणी विनाकारण फोन करून तुम्हाला त्रास देत असेल तर ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो.
या नवीन विधेयकामुळे नको असलेले कॉल्स थांबण्यास मदत होणार आहे. नवीन टेलिकॉम विधेयकामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सरकारने टेलिकॉम कंपन्यांच्या दंडाची रक्कम ५ हजारांवरून ५० हजारांवर आणली आहे. याशिवाय ग्राहकांवरील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. याशिवाय ओटीटीसाठी नियमही निश्चित करण्यात आले आहेत.
“सततचे मार्केटिंग कॉल्स आणि रेकॉर्ड कॉल्स याने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र, याबद्दल तक्रार करण्यासाठी वेगळा हेल्पलाइन नंबर ई-मेल अॅड्रेस किंवा तत्सम यंत्रणा असली पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिकांना याबद्दल थेट तक्रार करता येईल.” – ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, कंझ्युमर अँडव्होकेट असोसिएशन पुणे