पुणे -पावसाळा जवळ आला की “नालेसफाई’ हा “राष्ट्रीय कार्यक्रम’ पुणे शहरात असतो. साहजिकच याचा त्रास तेथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होतो. त्यांच्या घरात नाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी शिरते आणि संसार उघड्यावर येतात. ही वस्तुस्थिती असली तरी त्याला 80 टक्के जबाबदार नागरिकच आहेत हे नाकारून चालणारच नाही.
महापालिकेकडून नालेसफाई नीट केली जात नाही, पुन्हा गाळ वाहून येतो, काढलेला गाळ कडेलाच जमा करून ठेवला जातो आणि पुन्हा तो नाल्यात जातो. अनेक ठिकाणी नालेसफाई केली जात नाही. मुसळधार पावसात, कल्व्हर्टजवळ फुगवटा निर्माण होऊन आजूबाजूच्या घरांमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरते. ही ओरड दरवर्षीच होत असते.
आम्ही गाळ काढला असे प्रशासनाकडून सांगण्यात येते आणि फोटोग्राफ्स जारी केले जातात. मात्र, पुन्हा पुन्हा या नाल्यांमध्ये कचरा वाहून येतो आणि हा गाळ पुन्हा जमा होतो. हे कसे काय, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने नीट काम केले नाही, हेच दिले जाते. मात्र, याशिवाय नागरिकांचीही काही जबाबदारी आहे, हे विसरले जाते.
नागरिकांच्या पुढाकाराची गरज
पुणे शहरातील नालेसफाईचा विषय अतिशय गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याची एकट्या महापालिका आणि शासकीय यंत्रणांची जबाबदारी नाही. तर यासाठी नागरिकांनी लहान मोठ्या उपक्रमांद्वारे नाले सफाई करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यात कचऱ्याचा विषय हा नागरिकांनीच स्थानिक पातळीवर हाताळला तर, हा प्रश्न सोडविण्यास मदत होईल.
दुकानदार आणि नागरिकही जबाबदार…
आजूबाजूला राहणारे नागरिक, कचरावेचक, भंगारवाले, जुने कपडे विकणारे विक्रेते, पथारी व्यावसायिक, भाजीवाले, शहाळेवाले असे अनेक लोक या नाल्यामध्ये कचरा टाकत असतात. याच भागात राहणाऱ्या नागरिकांच्या ड्रेनेजचे तोंड हे नाल्याला जोडलेले असते. त्यामुळे घरात निर्माण होणारा कचरा, खरकटे या नाल्यामध्ये जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच सापडते. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, बॉटल्सचा समावेश आहे. त्यानंतर कपडे आणि अन्य गोष्टी सापडतात.
कचरा गोळा करण्याचा प्रश्न
अनेक वाड्यावस्त्यांमध्ये कचरावेचक नसल्याने कचरा कोण उचलणार हा प्रश्न असतो. कचरा वेचक असला तरी त्याला पैसे देण्याविषयी उदासीनता असते. सोसायट्यांमध्येही हीच परिस्थिती असते. त्यामुळे सगळ्या ठिकाणी कचरावेचक पोहोचत नाहीत. त्यातून कंटेनर फ्री शहर केल्यामुळे कचरा कोठे टाकावा, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
प्लॅस्टिक कचरा थेट नाल्यात…
या थेट नाल्यामध्ये आणून टाकल्या जातात. याची विल्हेवाट ही कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये होणे आवश्यक असताना त्या सर्रास नाल्यामध्ये टाकल्या जातात. पाण्याच्या बाटल्या तर अगदी सराईतपणे रस्त्यावर फेकल्या जातात. उन्हाळ्यामध्ये अशा बाटल्यांचा ढीग अनेक रस्त्यांवर दिसून येतो. या बाटल्यांवरून एखादे वाहनही घसरू शकते आणि अपघात होऊ शकतो. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी आहे, असे म्हणताना नागरिकांनीही त्यांचे कर्तव्य विसरता कामा नये, हे ही तितकेच खरे आहे.
कारवाईत प्रशासनाचा ढिसाळपणा
चेंबरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या अडकतात. अशावेळी केवळ चेंबर स्वच्छ केले जातात. परंतु संपूर्ण लाइन साफ केली जात नाही. परंतु पहिला पाऊस पडल्यानंतर तो चेंबरमधील राडारोडा वाहत बाहेर येतो. त्याचवेळी ते स्वच्छ करणे आवश्यक आहे. वर्षभर स्वच्छतेच्या निविदा काढल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.
नागरिकांच्या पुढाकाराची गरज
पुणे शहरातील नालेसफाईचा विषय अतिशय गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याची एकट्या महापालिका आणि शासकीय यंत्रणांची जबाबदारी नाही. तर यासाठी नागरिकांनी लहान मोठ्या उपक्रमांद्वारे नाले सफाई करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यात कचऱ्याचा विषय हा नागरिकांनीच स्थानिक पातळीवर हाताळला तर, हा प्रश्न सोडविण्यास मदत होईल.
महापालिकेकडून नालेसफाई सुरू आहेच. परंतु स्वच्छ केल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा राडारोडा, कचरा टाकला जातो हे वारंवार निदर्शनाला आले आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नये ही नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे.
-महेश पाटील, उपायुक्त, पुणे महापालिका