पुणे – खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडले जाणारे अडीच टीएमसी पाणी बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे वाया जाते. शिवाय, कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते, ही वेगळीच समस्या. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी हा 25 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्वेक्षणाचे काम सुरू असून आता भूमिगत कालव्याच्या आखणीचे कामही पूर्णत्वास आले आहे. जून 2022 पर्यंत या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार आहे, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
खडकवासला धरण ते फुरसुंगी हा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणी पुरवठा करावा, त्यासाठी सुमारे 1 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्यालगत असलेली सुमारे 2 हजार हेक्टर जागा आहे. तिचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. यातून बोगद्यासाठी येणारा खर्च करावा, असा विचार मध्यंतरी पुढे आला होता. त्यासाठी जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करावा, असे जलसंपदा विभागाने पीएमआरडीएला कळविले होते. तसे केल्यास बाप्पीभवन आणि गळतीमुळे होणारा पाण्याचा “लॉस’ भरून निघण्यास मदत होईल. त्यातून सुमारे अडीच टीएमसी पाणी वर्षभरात वाचणार आहे. मात्र, पीएमआरडीएने त्यास नकार दिला होता. त्यामुळे आता जलसंपदा विभागानेच हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास शासनाने मान्यता दिली. भूमिगत कालव्याची आखणी, भूगर्भाची रचना आदी माहितींचे विश्लेषण करून पुढील तीन महिन्यांत अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे जलसंपदा अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन धरण अशक्य
कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. कारण, आवश्यक असलेले पाणी यापूर्वीच अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली. तसेच नवीन धरण बांधायचे झाल्यास नवीन जागेचा शोध घ्यावा लागेल. याचसह भूसंपादन आणि पुनर्वसन हे काम आता अवघड आहे. यासर्व पार्श्वभूमीवर बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.