काटी, लाखेवाडी परिसरातील नागरिकांची आर्त हाक
पाण्याअभावी परिस्थिती गंभीर : उन्हाळी आवर्तनाची प्रतिक्षा कायम
नीलकंठ मोहिते
इंदापूर – इंदापूर तालुक्यात आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच उन्हाळ्यात तापमान जवळपास 40 अंश सेल्सियन्सच्या वरती गेल्याने, काटी, लाखेवाडी, सराफवाडी ,रेडा, रेडणी, वरकुटे या परिसरात शेतकर्यांच्या विहिरी, बोअरवेल आटले असून जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रशन बिकट झाला आहे. त्यातच तब्बल 15 ते 20 दिवस पाटबंधारे विभागाचे मिळणारे हक्काचे उन्हाळी आवर्तन लांबल्यामुळे शेतात असणारी ऊस, मका व बागा जागेवरतीच करपल्या आहेत. तर मुक्या जनावरांसाठी व पिण्यासाठी कोणी पाणी देता का… पाणी ? अशी म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर नागरिकांवर आलेली आहे.
अवर्षण प्रवण क्षेत्रातील काटी, रेडणी, वरकुटे, लाखेवाडी ही गावे असल्यामुळे मुळातच या परिसरात पाणी नाही. त्यातच भर म्हणून कडक उन्हाळा, परंपरेनुसार नियमाने मिळणारे पाटबंधारे विभागाचे उन्हाळी आवर्तन सोडले गेले नाही. काही तासात कालव्याला पाणी सोडले व बंद केले. त्यामुळे ते मिळणारे पाणी, आजपर्यंत शेतात पोहोचलेले नाही. शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी या परिसरात प्रत्येक घरी असल्याने जनावरांसाठी व त्या जनावरांच्या ओल्या चार्याच्या जोपासणीसाठी महत्त्वाचे पाणी आहे. ते पाणीच गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रास्त झाला आहे.
ऊस पीक करपले
शेतकरी नागरिक एकतर मागील काही वर्षांपासून लहरी वातावरण, करोनामुळे व पिकांवर सातत्याने पडणारे रोग, शेतीमालाला बाजारभाव नसणे आदी कारणांमुळे आर्थिक बाबतीत जर्जर झाले आहेत. त्यातच पाण्याची कमतरता असल्यामुळेच थोड्या प्रमाणात ऊस शेती जोपासून आपला प्रपंच चालवण्याची भूमिका शेतकर्याची सातत्याने असते. उसाचे नवे बियाणे महागले असल्यामुळे शेतकर्यांनी उसनवारी करून लागवण केल्या. त्यातच खते महाग झाल्याने मेहनतीच्या जोडीला आर्थिक ताण न परवडणारा झाला. मागील महिन्यापर्यंत हिरवागार असणारा ऊस उन्हाच्या तीव्रता त्यातच कालव्याचे पाणी मिळत नसल्यामुळे जागेवरच करपला असल्याने बळीराजाला डोक्याला हात लावून बसण्याखेरीज दुसरा इलाजच नाही.
तलावात पाणी सोडण्याची मागणी
नागरिकांच्या पिण्याचे पाणी व जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी अत्यंत कमी पडू लागले आहे. त्यामुळे रेडणी वडापुरीच्याा तलावात पाणी सोडा, अशी मागणी शेतकरी नागरिक करत आहेत.
मतदानावर होणार परिणाम
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत वेगात सुरू आहे. मात्र, जी दुष्काळी 22 गावे आहेत. या गावांतील शेतीला शेतकर्यांना, जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्यावर राजकारण तापले असून याचा फटका कोणत्या उमदेवाराला बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
उन्हाच्या झळा अधिक वाढल्या असल्याने विहिरीने तळ गाठला असून आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार.अशी पाण्याची गत झाली आहे. यासाठी एकमेव पर्याय फक्त उन्हाळी आवर्तन तात्काळ सोडले जावे. तरच, या भागातील पशुधन टिकले जाणार आहे.
– साहेबराव मोहिते, शेतकरी