नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा नदील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या दोनवर्षांपासून तापला आहे. या नदीत बारामती तालुक्यातील कारखान्याचे आणि फलटण तालुक्यातील दूध प्रकल्पाचे रसायन मिश्रित पाणी सोडल्याने पाण्याला हिरवा आणि काळा रंग आला आहे. तर तर जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे. तर पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नदी काठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही, राजकीय मंडळींना निवेदने देऊनही फक्त आश्वसनांशिवाय हाती काहीच लागत नसल्याने नीराकाठचे नागरिक, शेतकरी हतबल झाले आहेत.
नीरा नदीच्या पाण्यात रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदूषणमुक्त नदी होण्याचा मार्ग मोकळा होत नाही. दूषित पाण्यामुळे आरोग्यासह शेतीच्या पिकांना मोठा धोका उद्भवूू लागला आहे. पाणी शेतातील पिकांना दिल्यानंतर पिकांची वाढ खुंटली जाऊन पिके जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासकीय कार्यालयांत लेखी व तोंडी सूचना देऊन या गंभीर प्रकाराबद्दल दखल घेतली जात नाही.
तक्रार केल्यानंतर प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. त्यामुळे मध्यतरी सांगवी परिसरातील कांबळश्व, शिरवली व फलटण तालुक्यातील सांगवी, सोमंथळी, सोनगाव व माळवाडी येथील ग्रामस्थांनी सांगवी (ता. बारामती) येथे विषेश ग्रामसभा, रास्तारोको आंदोलनेही केली मात्र, प्रत्येकवेळी आश्वासनांवरच बोळवण करण्यात आली आहे.
नीरा नदीत येणारे रसायन मिश्रित पाणी बंद करण्यासाठी खांडज, सांगवी, नीरावागज, मेखळी, घाडगेवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत यात अनेक जणांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र, नदीतील प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याने अजून किती वर्षे आम्हाला या हे रसायन मिश्रित पाणी बंद करण्यासाठी झगडावे लागणार आहे, लोकप्रतिनीधिनी केवळ आश्वासनांवर बोळवण करीत असल्याने आता दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावला, या दूषित पाण्याबाबत केलेल्या आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी देखील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
शरद पवारांनाही आश्वासनाचा विसर?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी कृषी मंत्री शरद पवार हे 22 फेब्रुवारी 2019 रोजी फलटण दौऱ्यावर निघाले होते. त्यावेळी सांगवी (ता. बारामती) ग्रामस्थांनी त्यांना साकडे घातले. त्यावेळी त्यांना सांगवी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाणी प्रदूषणाची पहाणी करण्याची विनंती केल्याने त्याला प्रतिसाद देताना पवारांनी देखील तातडीने बारामती फलटण रस्त्यावरील नीरा नदीच्या पूलावरून प्रदूषित झालेल्या पाण्याची प्रत्यक्ष पहाणी केली. तर प्रदूषित पाणी सोडून देणाऱ्या संबंधीत संस्थांशी बोलून मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन याबाबत जातीने लक्ष घालून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या गोष्टीला ही आता दोन वर्षे उलटत आले तरी प्रदूषण कमी न होता वाढतच आहे, त्यामुळे शरद पवारांना दिलेल्या आश्वसनाचा विसर पडला का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
अजित पवार दिलेला शब्द विसरले?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक फेब्रुवारी 2020 मध्ये होती त्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत नीलकंठश्वर पॅनलच्या प्रचार सभेला आले होते, त्यावेळी माझ्या विचाराच्या पॅनलला निवडून द्या मी वर्षभरात नदीचे घाण पाणी कायमस्वरूपी बंद करीन असा शब्द सभासदांना दिला होता; मात्र याला आता काही दिवसांत वर्षपूर्ण होत आहे तरी देखील नीरा नदीमध्ये येणारे घाण पाणी येणे बंद झाले नाही, यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेल्या शब्दाचा विसर पडला की काय, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
खांडज (बारामती) : येथील नीरा नदीमध्ये कारखान्याचे आणि दूध प्रकल्पाचे केमिकलयुक्त दूषित पाणी मिसळत असल्याने हे पाणी काळे आणि हिरवे झाले आहे.