पळसदेव – कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड करोना काळात जीवावर उदार होऊन कार्य केलेले वैद्यकीय अधिकारी यांच्या नोकरीवर थोड्याच दिवसांत आरोग्य विभागाकडून कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्यामुळे ऐन संकट काळात केलेल्या कार्याचा आरोग्य विभागाला विसर पडला आहे, अशी भावना कंत्राटी आरोग्य अधिकारी यांनी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यात 2019पासून सुमारे 1400 बीएमएसचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण भागात मुख्यालयी राहून करोना महामारीच्या दोन्ही लाटेत उत्तम कार्य पार पाडले व आजपर्यंत पार पाडत आहेत. मागील वर्षी जून महिन्यात रातोरात मंत्रिमंडळ निर्णय घेऊन राज्य शासनाने करोना दोन्ही लाट संपल्या असतानाही 1899 एमबीबीएस राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ यांना कोणताही शासकीय अनुभव नसताना कोणतीही एमपीएससी सरळसेवा मुलाखत न घेता टक्केवारीच्या अनुक्रमाणे भरती केली व प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएमएस वैद्यकीय अधिकारी यांना नोकरीवरून घरी पाठवले आहे.
आरोग्य विभागाच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालय मुंबई येथे याचिकाही दाखल करण्यात आली आहे. तसेच यावर्षी 2022मध्ये बॉण्डच्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या जवळपास 500 बीएमएस वैद्यकीय अधिकारी यांना येणाऱ्या 10 दिवसांत घरी पाठवण्याचा घाट रचला आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कार्यरत असतानादेखील रिक्त पदे दाखवली आहेत, असा आरोप सध्या कार्यरत असलेले कंत्राटी आरोग्य अधिकारी यांनी केला आहे.
ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया महाआयुष असोसिएशन मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार आहे. न्याय न मिळाल्यास डॉक्टरांना आमरण उपोषण हाच मार्ग स्वीकारावा लागेल, तरी यावर मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.