बारामती/जळोची – महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून 74 मीटरचा जगातील सर्वांत उंच भगव्या रुंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. शेवटी 15 ऑक्टोबर रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल, अशी घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली.
बारामती येथे राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरणानंतर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रात पाहिल्यांदाच राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेस प्रतिसाद मिळाला.
यंदा स्पर्धेचे तिसरे पर्व जल्लोषात पार पडले. यावेळी राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांतून 197 तालुक्यांतून 1220 संघ तसेच 14 हजार 512 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. माऊली सावंत, श्रीधर भोसले, रामेश्वर डांगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कर्जत-जामखेड विभागीय आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय अशा दोन गटातील विजेते- सृजन भजन स्पर्धा- कर्जत-जामखेड विभाग, प्रथम- हरिभाऊ काळे, द्वितीय- पांडुरंग डाडर, तृतीय- शिवाजी पांढरे.
सृजन भजन स्पर्धा- महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम- गोपाळ सालोडकर, अमरावती, द्वितीय- विद्याधर तांबे, मुंबई, तृतीय- रुपेश देशमुख, कोकण. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. वारकरी संप्रदायमधील मान्यवरांचा राजेंद्र पवार, सुनंदा पवार व कुंती पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यातील 31 संघ सहभागी झाले होते. तामिळनाडूतील 26 संघ, कर्नाटकातील 3 संघ, गुजरात आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी 1 संघाने सहभाग घेतला.