सर्वपक्षीय प्रतिसाद : शासन स्तरावर दबावतंत्र
राजेंद्र वारघडे
पाबळ – शिरूर तालुक्यातील बारा गावांनी पाण्यासाठी आंदोलन छेडले आहे. त्या माध्यमातून संबंधित खात्याच्या मंत्र्यांसह स्थानिक आजी, माजी आमदार, खासदार तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तशा आशयाची निवेदन पाठवण्यात आली आहेत. सर्वांनी आंदोलनाच्या भागात येऊन दखल घ्यावी, अशी सुरुवातीला अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार आंदोलकांना चोहोबाजूंनी मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार आढळराव यांनी पाबळ येथे आंदोलनकर्त्यांच्या बैठकीत येऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. अशोक टाव्हरे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने सर्वपक्षीय कोरम पूर्ण झाला आहे.
यामध्ये सुरुवातीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाबळ येथे आंदोलकांना संबोधित केले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी कारखानास्थळावर आंदोलकांना बोलावून पाणी देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. आंदोलकांना आता तिसरी आमंत्रण मिळाले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचाही संदेश आंदोलकांच्या ग्रुपवर फिरत आहे. त्यानुसार दि. 12 ऑक्टोबर रोजी पुणे येथे आंदोलकांनी येऊन भेटावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून आंदोलकांना पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमंत्रित केले आहे. ग्रामविकास प्रतिष्ठानचे टाव्हरे यांनी जलसंपदा खात्याची बैठक आयोजित करण्यापर्यंत मजल मारल्याने आता आंदोलकांची दखल घेण्याचा पहिला कोरम पूर्ण झाल्याने आता निर्णय काय होतो याची प्रतीक्षा लागली आहे.
“आता फक्त पाणी आणायचे …
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारा गावांनी “आता फक्त पाणी आणायचे आणि ते मिळवायचेच’ असा एल्गार करून आंदोलनाला तोंड फोडले आहे. यासाठी बारा गावांतील ग्रामसभेत ठराव घेण्यात आले आहे. संबंधित मंत्र्यांना पत्रे देण्यात आली आहेत. याबाबतीत या मंत्र्यांनी बारा गावांमध्ये येऊनच चर्चा करावी व पाणी प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या अपेक्षेला प्रतिसाद देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार आढळराव यांनी पाबळ येथे आंदोलनकर्त्यांच्या बैठकीत येऊन मार्गदर्शन केले तर दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेबतोबर बैठक घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे तर अशोक टाव्हरे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने सर्वपक्षीय कोरम पूर्ण झाला आहे.