दिवाळीच्या तोंडावर भात कापणी सुरू; पावसाअभावी उत्पादनात 40 टक्के घट
वेल्हे – वेल्हे तालुक्यातील राजगड, मांगदरी, आठरागाव मावळ, पानशेत खोरे या शिवारांत काही ठिकाणी दिवाळीच्या तोंडावर भात कापणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण परिसरामध्ये विविध जातींच्या भातांचा सुगंध दरवळत आहे. मात्र, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात सुमारे 40 टक्क्यांपेक्षा जास्त घट पाहायला मिळत असून, तांदूळ महागण्याची शक्यता आहे.
या भागात अनेक ठिकाणी ग्राहकांनी तांदळाची वर्षभराची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना तांदूळ खरेदीसाठी आगाऊ रक्कम दिलेली आहे. थोड्याच दिवसात भात कापणीनंतर भात मळणी आणि भरडणी झाली की या भागातले शेतकरी ग्राहकाच्या घरापर्यंत तांदूळ पोहोचवतात. यासाठी येणारा खर्चसुद्धा ग्राहक करतात.
यंदा पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले असले तरीही शेतकरी ठरलेल्या ग्राहकाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तांदूळ पोहचवणार आहेत आणि त्याहीपेक्षा सणासुदीच्या तोंडावर गाठीला चार पैसे शेतकऱ्याला मिळणार आहे. तालुक्यात सुवासिक इंद्रायणी, आंबेमोहोर, इंडम, फुलेराधा, वरंगाळ याशिवाय नाचणी, वरई, यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
सर्वाधिक मागणी सुवासिक इंद्रायणी तांदळाला आहे. भोर आणि वेल्हे तालुक्यात नसरापूर ही तांदूळ खरेदीदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. दर रविवारी इथे मोठा बाजार भरतो.
ज्या ठिकाणी तांदूळ उत्पादन होते त्याची किंमत आणि ज्या ठिकाणी विकला जातो त्याची किंमत यात तफावत आहे. जिथे तो पिकतो त्यापेक्षा तो बाजारात स्वस्त मिळतो हे न समजणारे कोडे आहे. मात्र तो ग्राहकांना स्वस्तात मिळतो म्हणून तो सुवासिक असतो असेच म्हणावे लागेल. ज्यांना याची खरी माहिती आहे ते ग्राहक स्थानिक ठिकाणी जाऊनच भात खरेदी करतात.
– विजय दीक्षित, कृषी सेवक, केळद
तांदूळ शेती ग्राहकांचे आकर्षण
या भागात तांदूळ खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहकानना भात कापणी कशी चालू आहे, त्याची वाहतूक काशी केली जाते, त्याची मळणी आणि भरडणी हे आवर्जून पाहत असतात. काही कुटुंबे मुलांना शेतकरी राजा कसे काम करतो, कशी भात लावणी करतो आणि त्यांना काय काय मेहनत करावी लागते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याच्या दृष्टीनेही एक अभ्यास सहलही घडवतात. आपल्या घरात येणार तांदूळ कसा आणि कुठून येतो हे पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल असते.