वाल्ह्यात प्रशासनाकडून दखल : आंदोलनाचा घेतला धसका
वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) येथील शहीद शंकर शिंदे चौकामधील ओढ्यावरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या सुरुवातीलाच मध्यभागी पाइपलाइन फुटली होती. खोदकामामुळे वाहतुकीसाठी अर्धा पूल बंद होता. गटारीचे खराब पाणी वाहत होते. दरम्यान, “वाल्ह्यातील अर्धा पूल बंदच’ असे वृत्त ‘दैनिक प्रभात’ने (दि.21) प्रसिद्ध केल्याने तात्काळ वृत्ताची दखल स्थानिक प्रशासनाने घेतली. गुरूवार (दि.23) दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
ओढ्यावरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या सुरुवातीलाच मध्यभागी पाइपलाइन फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तसेच वाल्हे गावातून कुबेर आळीकडून येणाऱ्या गटारीच्या पाइपलाइन फुटल्यामुळे या ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून मोठा खड्डा खाणला आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून येथील गटाचे काम केले नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती.
दरम्यान, माजी सरपंच महादेव चव्हाण यांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने तात्काळ काम सुरू केल्याने चव्हाण यांच्या आंदोलनाचा धसका घेतल्याने प्रशासनाने काम तडीस नेले.
“दैनिक प्रभात’मधील वृत्ताची दखल स्थानिक प्रशासनाने तात्काळ घेऊन, वेळीच ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, सरपंच अतुल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ, सागर भुजबळ यांनी पूलाजवळ पाहणी केली. ठेकदाराला बोलवून घेत काम सुरू करण्यास सांगितले. कामासाठी लागणारे मटेरियल आणून टाकले. गुरुवारी काम सुरू केले. माजी सरपंच महादेव चव्हाण यांनी प्रशासनाचे आभार मानले.