प्रतवारीतही घसरण, टिकवण क्षमता संपुष्टात आली
रमेश जाधव
रांजणी – गेल्या वर्षी रब्बी, उन्हाळी हंगामातील कांद्याची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बराकीत कांदा साठवणूक केली होती. कांदा काढणीच्या पश्चात उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. एकरी उत्पादनात सुमारे 50 टक्केपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा बराकीत साठविला; मात्र यंदा पावसाने सरासरी ओलांडल्याने पावसामुळे कांद्याची चाळीस टक्क्यांहून अधिक सड झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याला भाव वाढ होईल, या अपेक्षेने बराकीत कांदा साठवला; परंतु उत्पादन खर्च वसूल होईल इतका देखील सध्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे पावसामुळे सड होऊन कांदा संपुष्टात येत आहे. तर दुसरीकडे कांद्याला बाजारभावच नसल्याने तो चाळीतच ठेवल्याने नुकसान वाढत चालले आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेनुसार खरीप हंगामापासून टप्प्याटप्प्याने कांदा विकला; मात्र त्यांना अपेक्षित कांद्याचा बाजारभाव मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
शेतकऱ्यांचा निम्मा कांदा विकला गेला; तोही तोट्यात. विक्री आणि मोबदल्याचे विसंगत चित्र पाहायला मिळते. शिल्लक राहिलेला कांदा दोन पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा असताना डोळ्यासमोरच कांदा काळपट पडून त्याची टरफले निघून जात आहेत. तर काही कांदाचाळीमधून अक्षरशः काळे पाणी वाहू लागल्याचे विदारक चित्र दिसून येते. त्यामुळे कांद्याचा साठा संपुष्टात येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.
एकूणच कांद्याच्या उत्पादनात अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नव्हते. कांदा साठवणूक करताना कांदा निवडून तो चाळीत साठविला गेला. साठवलेल्या कांद्याला चार ते पाच महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. आता बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तर त्यात कांद्याची सड वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
कांद्याला गुणवत्तेअभावी बाजारात उठाव नसुन प्रतिकूल वातावरण अतिवृष्टी आणि मजूर टंचाईमुळे उत्पादन खर्च दुपटीने वाढूनही उत्पन्न मात्र निम्म्यावर आले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे गणित कसे जुळवावे हा शेतकऱ्यांपुढे मोठा यक्षप्रश्न आहे. त्यामुळे नुकसान जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांनी पुन्हा कसे उभे राहायचे असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
साठवलेल्या कांद्याला बाजारभावाअभावी फटका बसला आहे. बराकीत साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतवारीदेखील खूपच खालावली असून शासनाने काही हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी.
-मंगेश जाधव, शेतकरी जाधववाडी
अतिपाऊस आणि दमट हवामानामुळे बहुतांशी कांदा चाळीत सडला असून शिल्लक कांदा अजून विक्रीपर्यंत किती राहील याची शाश्वती नाही. येणाऱ्या काळात कितीही भाववाढ झाली तरी नुकसान भरून निघणार नाही.
-धोंडीभाऊ भोर, कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते वळती