मंचर- इको सेन्सिटिव्ह झोनमधील आदिवासींच्या पेसा व वनहक्क कायद्याच्या तरतुदीवर कोणतीही गदा येणार नाही. प्रशासन सातत्याने तोंडी भूमिका मांडत असले तरीही अधिसूचनेततील काही बाबी या पेसा व वनहक्क या दोन्ही कायद्यांना बाधा असणाऱ्या आहेत. त्यामुळे आदिवासींच्या व इतर समुदायाच्या स्थानिक लोकांना या कायद्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या हक्कांवर गदा येणार नाही, या तोंडी भूमिकेवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
किसान संघटनेचे पदाधिकारी व जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्यासोबत जुन्नर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी मांडलेली भूमिका व त्यावर संघटनेचे म्हणणे सविस्तरपणे मांडले.
यावेळी किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे, सचिव डॉ. अमोल वाघमारे, उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, सहसचिव अशोक पेकारी, राजू घोडे, राजाराम बोऱ्हडे, आदिवासी अधिकार मंचाचे किरण लोहकरे, किसान सभा एसएफआय केंद्रीय समिती सदस्य सोमनाथ निर्मळ, नामदेव विरणक, बुधा बुळे, मुकुंद घोडे, काळू लांडे, “डीवायएफआय’चे अध्यक्ष संजय साबळे, सचिव गणपत घोडे, रामदास लोहकरे, सुभाष भोकटे, वसंत वडेकर उपस्थित होते.
भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह झोनच्या अधिसूचनेतील सनियंत्रण समितीमध्ये स्थानिकांना प्रतिनिधित्व नाही. ही अधिसूचना तात्काळ रद्द करून पेसा व वन हक्क कायद्याच्या तरतुदींचे पालन करून स्थानिकांना विश्वासात घेऊन जैवविविधताचे सरंक्षण व संवर्धन केले पाहिजे.
स्थानिक समुदायाच्या पर्यावरणपूरक रोजगाराच्या संधीची अधिकाधिक निर्मिती करावी. झोनबाबत आधी झालेली अधिसूचनेची निर्मिती प्रक्रिया, अवलंबलेली पद्धती व त्यातील तरतुदीमुळे पेसा-वनहक्क कायद्याच्या तरतुदींचा भंग झाला आहे. भविष्यात अधिसुचनेतील तरतुदींचा वापर वनविभागाकडून आदिवासींचे शोषण करण्यासाठी केला जाईल, असे अनुभव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन सर्वांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित केले जाईल. ज्या गावांना अद्याप सामूहिक वन हक्क प्राप्त झाले नाहीत किंवा जे प्रलंबित व्यक्तिगत वनहक्क आहेत, अशा गावांचे वनहक्क दावे लवकरात लवकर दाखल होण्यासाठी वनविभागाकडून सहकार्य केले जाईल. मनरेगाअंतर्गत गावातच वनविभागाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे लोकांना उपलब्ध करून दिली जातील.
– जयरामे गौडा, उपवनसंरक्षक, जुन्नर.