राजगुरूनगर : येथील अण्णा भाऊ साठेनगरमध्ये पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि कचरा प्रश्न आदी समस्या सुटत नसल्याने महिलांनी मुख्याधिकारी केबिन पुढे ठिय्या आंदोलन केले
राजगुरूनगर – शहरातील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये नागरिकांना मिळणार्या अपुर्या सुविधांबाबत साठे नगरमध्ये राहणार्या नागरिकांनी राजगुरूनगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केले मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना घेराव घातला व त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला.
अनेक वर्षांपासून अण्णा भाऊ साठे नगरमध्ये कचरा, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. साठे नगरशेजारी शहराचा कचरा डेपो असल्याने या वस्तीमध्ये दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही फुटलेल्या पाणी लाइन पाइप दुरुस्त केले जात नाहीत. कचरा उचलला जात नाही. या नगरमध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास असून एक हजाराच्यावर लोकसंख्या आहे.
राजगुरूनगर परिषदेकडून पाणीपुरवठा अलीकडे बंद केल्याने येथील महिला नागरिकांनी नगरपरिषदेत येवून मुख्याधिकारी यांच्या कक्षापुढे सोमवारी (दि. 8) ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरू होत नाही. फुटलेल्या पाइप लाइन दुरुस्त केल्या नाहीत कचरा उचलला जात नाही शौचालय साफ केले जात नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल अशी पवित्रा महिलांनी घेतली. यावेळी महिला पुरुषांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दलीत स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस बबनराव पाटोळे, महिला जिल्हा अध्यक्षा अक्काताई गुंजाळ, माजी नगरसेवक शंकर राक्षे, मातंग एकता आंदोलन तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायदंडे यांच्यासह अण्णाभाऊ साठे नगरमधील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी नगरपरिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी बोलावून घेत नागरिकांच्या समोर त्यांची कानउघाडणी केली. मात्र, महिला आक्रमक होत्या. आम्ही गरीब मागासवर्गीय असल्याने जाणूनबुजून नगरपरिषदेचे कर्मचारी पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा देत नसल्याचा आरोप केला.
नगरपरिषदेत अनेकदा तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जातात. घाणीचे दुर्गंधी अस्ताव्यस्त पडलेला कचरा, पाण्याचा अभाव अस्वच्छता यामुळे आरोग्य धोक्यात असल्याचे सांगत या सुविधा देण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी महिलांनी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी काम करतात त्यांच्या तक्रारींचा मुख्याधिकार्यांकडे पाढा वाचला.
“अण्णा भाऊ साठे नगरमध्ये पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता आदी सर्व सुविधा पुरवण्यात येतील यात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई केली जाईल. याबाबत महिलांना लेखी पत्र दिले आहे.” – श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी