निवडणुकीस हिरवा कंदील : उच्च न्यायालयाची निवडणूक प्राधिकरणास परवानगी
पुणे – घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, आमदार अशोक पवार यांनी ही निवडणूक लवकर घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर विरोधी गटाने माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनाने निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावे, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. यात विरोधकांचा अर्ज फेटाळला.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्यादेशाचा दिलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. तिथून पुढे सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. घोडगंगाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे (दि.30) सप्टेबरपर्यंत स्थगित दिली होती. यात माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी ऊस उत्पादक शिरूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
छाननीअंती तो अर्ज वैध ठरला होता. परंतु दरम्यानच्या काळात बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी (दि. 31) ऑगस्टला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवून पाचर्णे यांचे निधन झाल्याने मार्गदर्शन मागितले होते.
निवडणूक अधिकारी यांच्या (दि.31) ऑगस्टच्या पत्रानुसार सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणूक अधिकारी आहेर यांना पत्र पाठवून आदेश व मार्गदर्शन दिले. पत्रामध्ये प्राधिकरणाने स्पष्टपणे नमूद केल्यानुसार (महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक) नियम 2014 चे नियम 31 नुसार उमेदवाराच्या मृत्युची माहिती मिळताच संस्थेची निवडणूक प्रत्यदेशित करणेबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खालीलअंती निर्णय आदेश पारित करणे आवश्यक आहे. प्राधिकरणाचे आदेश (दि.18) एप्रिलनुसार मार्गदर्शक सूचना पारित केल्याचे नमूद केले आहे. निवडणूक प्रत्यदेशित करणे खात्री अंती त्वरित कार्यवाही करून 30 सप्टेंबरपर्यंत होणारा सुधारित निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेसत्व सादर करण्याचे आदेश दिले होते.
सहकारी प्राधिकरणाने (दि.18) एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीबाबत प्रत्यादेश (दि.13) सप्टेंबर रोजी जाहीर करून कारखाना प्रशासनास कळविले. निवडणूक अधिकारी यांच्या फेर निवडणूक प्रकियेच्या विरोधात कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्यादेशाचा दिलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. तिथून पुढे सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी सरकार पक्षाकडून ऍड. दिलीप पाटील बनकर, घोडगंगा किसान क्रांती पॅनेलतर्फे राहुल गवारे यांच्याकडून ऍड. अजिंक्य उडान, ऍड. सुरेश पलांडे, घोडगंगा कारखाना व आमदार अशोक पवार यांच्याकडून ज्येष्ठ वकील ऍड. जहागिरदार, ऍड. राणे यांनी काम पाहिले. याबाबतची माहिती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, माजी संचालक ऍड. सुरेशराव पलांडे,शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, मार्केट कमिटीचे संचालक राहुल गवारे यांनी दिली.
हरकत याचिकेवर निकाल
निवडणूक प्राधिकरण व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर निवडणूक प्रकिया करून पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्याचे आदेश (दि.13) सप्टेंबर रोजी पारित केले होते. परंतु पाचर्णे यांच्या जागेवर नवीन अर्ज येऊ न देण्यासाठी आमदार पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यादेश आदेशाविरोधात हरकत याचिका दाखल केली होती. त्यावर अनेक तारखा होऊन (दि.4) ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन (दि.17) निकाल दिला आहे.