नीलकंठ मोहिते
इंदापूर – नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अनागोंदी, भ्रष्ट व नियमबाह्य कारभारामुळे प्रदीर्घकाळ थकलेल्या कर्जवसुलीसाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाने अखेरचा उपाय म्हणून कारखान्याच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव येत्या 16 नोव्हेंबर रोजी काढला आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक व सामाजिक पत धोक्यात आल्याची सडेतोड टिका शेतकरी संघर्ष समितीचे मार्गदर्शक व पुणे जिल्हा माध्यवर्ती बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केली.
याबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष पंडीतराव पाटील म्हणाले, कारखान्याने युनियन बॅंकेच्या काटेवाडी शाखेकडून 30 कोटी 56 लाखांचे कर्ज काढले या कर्जाची परतफेड करण्यासाठी बॅंकेने कारखान्यास सतत तगादा लावूनही कारखान्याने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे बॅंकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन बॅंकेकडे तारण असलेल्या कारखान्याच्या स्थावर मालमत्तेचा येत्या 16 नोव्हेंबरला जाहीर लिलाव घोषित केला आहे.
नीरा भीमा कारखान्याने मुंबई, ठाणे, पुणे, रेडणी, काटेवाडी इत्यादी विविध ठिकाणाच्या बॅंकेची व शासकीय कर्जे उचलण्याचा उच्चांक केला आहे. या रक्कमा आपल्या खासगी कारखान्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. कारखान्यातील अनियमितेमुळे कारखान्यास सभासदांची ऊस बिले तब्बल 6-6 महिने देता आली नाहीत. यामुळे सभासदात मोठा असंतोष निर्माण झाला.
सुनावणी पुढील महिन्यात असल्याने माझ्यावर सभासदांचा मोठा विश्वास आहे असे म्हणून मलई खाण्याचे धंदे बंद केले नाहीत तर नजीकच्या काळात ही सहकारी संस्था मोडीत निघेल. म्हणून या लिलाव प्रक्रियेत आप्पासाहेब जगदाळे यांनी सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी सहभागी होऊन संस्था वाचवावी, अशा प्रतिक्रिया समितीकडे अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले, कारखान्याच्या स्थावर मालमत्तेचा वसुलीसाठी जाहिर लिलाव ही बाब अत्यंत नामुष्कीची असून सभासदातील विश्वासार्हतेला तडा लावणारी आहे. अशा बेताल व दिशाहिन कारभारामुळे नेतृत्वाचे सर्वांगाने चाललेले अधःपतन कोणीही थांगवू शकत नाही. समितीचे सरचिटणीस विजय गायकवाड म्हणाले, सर्व नियमांची व कायद्याची पायमल्ली करून कारखान्याने सर्वसाधारण सभा घेतली.
पोलीस व कर्मचान्यांच्या बळावर घेतलेल्या सभेत आपणास सोयीचे असणारे ठराव अवैध पद्धतीने मंजूर करून घेण्याचे महापातक संस्थापक अध्यक्षांनी केल्यामुळे सभासद त्यांना आता माफ करणार नाहीत. येणाऱ्या सिझनला नीरा भीमा कारखान्यास सभासदांनी ऊस का व कशासाठी द्यावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारी कारखाना ही कोणाचीही व्यक्तीगत मालकी नाही, आपण विश्वस्त म्हणून काम करताना किमान जनाला नाही तर मनाला लाजले पाहिजे. सभासदांचा विश्वासाने गळा कापणे निश्तिच भूषणावह नाही.