छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर शिवाई देवीचे मंदीर आहे. राजमाता जिजाऊंनी महाराजांचे नामकरण याच माता शिवाईदेवीला केलेल्या नवसावरून शिवाजी असे केले होते. जुन्नर शहराजवळ असलेल्या कुसुर गावाच्या हद्दीत असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी लाखो शिवभक्त येतात.
यावेळी ते गडाच्या मध्यावर असलेल्या शिवाई देवीपुढे आवर्जून नतमस्तक होतात. विशेषतः नवरात्रीच्या काळात या ठिकाणी भभाविक मोठ्या संख्येने येत असतात. शिवाई देवी ट्रस्ट आणि कुसुर ग्रामस्थांच्या वतीने या काळात विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते.
मुघलकालीन युद्धाच्या धामधुमीत शहाजीराजांनी 1629 मध्ये राजमाता जिजाऊंना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. गडावरील शिवाई मातेवर जिजाऊंची विशेष श्रद्धा होती. किल्ले शिवनेरीवरील राजमाता जिजाबाई यांच्या पूजेतील गडदेवता असलेल्या शिवाई देवीच्या मूळ मूर्तीचे (अंदाजे 1930 पूर्वीचे) छायाचित्र काही वर्षांपूर्वी उपलब्ध झाले होते. सध्या असलेली शिवाई देवीची मूर्ती व तांदळा 1935 मध्ये नव्याने स्थापित करण्यात आला आहे.
1932 च्या सुमारास गुप्तधनाच्या आमिषापोटी शिवाई देवीची मूळ शिवकालीन मूर्ती व तांदळ यांची हानी करण्यात आली होती, अशी माहिती जुनेजाणते सांगतात. हे कृष्णधवल छायाचित्र जुन्नरमधील ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक स्व. नारायण मते यांच्या संग्रहात होते. दुर्मिळ नाणी संग्राहक पृथ्वीराज मते यांनी हा फोटो उपलब्ध करून दिला होता.
दरम्यान मुघलपूर्व काळात किल्ले शिवनेरी डोंगर कोळी बांधवांच्या ताब्यात होता. त्याकाळी त्यांनीच गडदेवता शिवाई देवीची प्रतिष्ठापना केली असावी, असे इतिहास अभ्यासक सांगतात. डोंगरकड्याच्या पाषाणात कोरण्यात आलेल्या मोठ्या दगडी घुमटामध्येच शिवाई देवीची मूर्ती व तांदळा स्थापन केलेला होता. 1935 मध्ये नव्याने घडविण्यात आलेली चतुर्भुज मूर्ती आकर्षक आहे.
पूर्वीच्या दगडी घुमटीचे रूपांतर आकर्षक चारखांबी नक्षीदार प्रभावळीत करण्यात आले. मूर्तीसमोरील तांदळा मोठ्या आकाराचा करण्यात आलेला आहे. मूर्तीच्या पुढे नाक, कान, डोळे कोरलेली, शेंदूर लावलेली आत्मलिंगाप्रमाणे असलेली स्वयंभू मूर्ती आहे. तिला तांदळा संबोधले जाते. या मूर्तीला नंतर स्थानिक भक्तांनी तैलरंग दिलेला होता.
मूर्ती मूळ रुपात
आठ वर्षांपूर्वी शिवाई देवी मंदिराच्या संवर्धनाच्या वेळी पुरातत्त्व विभागाने प्रभावळीवरील तैलरंग काढून टाकून मूर्ती मूळ स्वरूपात आणली. देवीच्या मंदिरातील सुबक, कलापूर्ण, नक्षीदार लाकडी सभामंडपाचे काम नव्याने पेशवाई काळात करण्यात आले होते. तसेच सभामंडप व परिसराची दुरुस्ती 1907 मध्ये मराठे मंडळी ट्रस्ट मुंबई या भाजी व्यापार करणाऱ्या संस्थेने केल्याची नोंद आहे. अलीकडे या सभामंडपाची दुरुस्ती जुन्या धाटणीतील सागवानी लाकडात करण्यात आली आहे. चंद्रपूरवरून खास सागवानी लाकूड आणून त्यावर उत्तम नक्षीकाम करण्यात आले आहे.