आंबेगावात जिल्हा बॅंक, दूध संघ निवडणुकीत मते फुटली
चुकीचे काम करणाऱ्यांना जाब विचारणार, की कात्रजचा घाट दाखवणार : संतोष वळसे पाटील
मंचर – आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बलस्थाने मोठी असली तरी अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पक्षाला मतफुटीचा सामना करावा लागला. विरोधकांची ताकद नगण्य असली तरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्याच काही नाराज नेत्यांकडून रसद पुरवली गेल्याच्या चर्चेचे काहूर तालुक्यात सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना जाब विचारणार का, त्यांना कात्रजचा घाट दाखविला पाहिजे, यासाठी पक्ष संघटन मौन का बाळगते, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकाराचे जाळे तालुक्यात भक्कम आहे. तालुक्यातील बाजार समिती, भीमाशंकर कारखाना, शरद बॅंक, शेतमाल प्रक्रिया संस्था, खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ या संस्थांवर राष्ट्रवादीचे निविर्वाद वर्चस्व आहे. तेथील संचालकांना निवडून देण्यासाठी मतदार राष्ट्रवादीबरोबर भक्कम आहेत; परंतु भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून आंबेगाव तालुक्यातून मिळालेली मते चिंतेचा विषय ठरला.
यावेळी कंद यांना तालुक्यातून 24 एवढी मते पडली; परंतु त्यांना एवढी मते कशामुळे पडली, याचा शोध राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतला नाही. कोणाची मते त्यांना मिळाली याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे; मात्र त्यावेळी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना जाब न विचारल्याचा तोटा झाल्याचे जाणवले. पुन्हा कात्रज जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मते फुटल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर संशयाची पाल चुकचुकली. विरोधकांना मते का पडतात, कोण गद्दार आहे, याबाबत पक्षात मंथन होणे गरजेचे आहे.
महत्त्वाची पदे दिली तेच बिघडले
पक्षांतर्गत कलह असला तरी त्याची किंमत लागोपाठ झालेल्या दोन निवडणुकीत पक्षाला मोजावी लागली. गाव आणि वाड्या-वस्त्यांवरील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना व्यक्तिशः मानणारी आहेत. त्यांचा काही दोष नाही; परंतु ज्यांना महत्त्वाची पदे दिली, तेच नेते पदाच्या मस्तीमुळे बिघडले असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कमीपणा होईल, अशा पद्धतीने ते काम करतात, अशी खंत सामान्य कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
एक व्यक्ती, एक पद
राष्ट्रवादीने पदांचे वाटप करताना एक व्यक्ती एक पद या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. पक्षात राहून पक्षनेतृत्वावर कमीपणा होणाऱ्या गद्दारांची तातडीने हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या बाजार समिती, भीमाशंकर कारखाना किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला किंमत मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भरवशाचे नेते, तरीही फटका
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विष्णु हिंगे यांना 35, तर शिवसेनेचे अरुण गिरे यांना 12 मते मिळाली. राष्ट्रवादीकडे सुमारे 43 मते असताना ती फुटली कशी, याबाबत चर्चा सुरु आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यामुळे तालुक्यात त्यांचा संपर्क कमी होऊ लागला, तर तालुक्यातील राष्ट्रवादीचे भरवशाचे नेते नेहमीप्रमाणे एकमेकांच्या पायात पाय अडकविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये तालुक्यात सर्व आलबेल आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.