प्रवाशांना ताटकळतात : प्रशासनाचे दुर्लक्ष
आळंदी – आळंदी देवाची येथील पीएमपीएमलच्या मुख्य बस थांब्यावरील प्रवासी निवारा शेडची दुरवस्था झाली असून हा प्रवाशांना ताटकळतच थांबावे लागत असूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
आळंदीतील पीएमपीचा मुख्य बस थांबा असल्याने येथून पुणे व उपनगराकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची कार्तिकी एकादशी आणि आषाढ वारीला प्रचंड गर्दी होत असते. रोज पुणे व विविध भागात येथुन बसगाड्यांच्या जवळपास 103 फेऱ्या होतात.
ऊन, वारा, पावसात प्रवाशांना परिसरातील हॉटेल, दुकाने, झाडांचा आश्रय घ्यावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन या निवाराशेडची सुधारणा करण्यात आलेली नाही. निवारा शेडच्या पत्र्यांचा रंग उडालेला असून लोखंडी पाइपांना गंज लागला आहे. तर ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था नाही.
प्रवासी संख्येच्या तुलनेत येथे नवीन निवारा शेडची व्यवस्था करावी अशी, मागणी आळंदीकर नागरिकांमधून होत आहे. गेली अनेक वर्षांपासून हा प्रवासी थांबा “जैसे थे’ स्थितीत आहे. येथे बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. बसथांबा परिसरात पालिकेकडून झाडाखाली खुर्च्याबाके बसविण्यात आली आहेत; मात्र पावसाळ्यात निवाऱ्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि स्वच्छतागृह पण नाही, असे राम निकाळजे यांनी सांगितले.
…”जैसे थे’
प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत मुख्य बसस्थानक असूनही येथे प्रवाशांसाठी अपुरी जुनी व्यवस्था “जैसे थे’ आहे. यातच निवारा शेडमधे अस्वच्छता असल्याने प्रवासी बसस्थानक परिसरातील झाडांचा आश्रय घेतात. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने बस थांब्यासमोर ताटकळत थांबावे लागते. तर शेजारीच काही अंतरावर ज्येष्ठ नागरीकांसाठी उभारण्यात आलेल्या कट्ट्याचा प्रवाशांना आश्रय घ्यावा लागतो.