पुणे –मागील काही दिवसांत साबुदाण्याच्या भावात मोठी घट झाली होती. त्यानंतर दीर्घकाळ भावात वाढ न झाल्याने उत्पादक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कंपन्यांनी साबुदाण्याच्या भावात 100 किलोच्या पोत्यामागे सुमारे 300 ते 400 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
साबुदाण्याच्या 100 किलोच्या दरात 300 ते 400 रुपयांनी घट झाली होती. ती भरून काढण्यासाठी आता ही वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातील उत्पादक महाराष्ट्रासह संपूर्ण देशात साबुदाणाचा पुरवठा करत असतात.
आता तेथील कंपन्यांनी भाव वाढवण्याचा निर्णय घेतल्याने विक्रेत्यांनाही हे भाव वाढवावे लागणार आहेत. दरम्यान, यामुळे उपवासदेखील महागणार असल्याचे चिन्ह आहे.
उपवासाला साबुदाणा चालतो. तसेच हॉटेल चालकांकडूनही साबुदाणाला मागणी असते. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यांत साबुदाणाला चांगली मागणी असते. साबुदाणा उत्पादकांनीच दरवाढीचा निर्णय घेतल्याने त्यात आता घट न होण्याचा अंदाज आहे.
– अशोक लोढा, साबुदाण्याचे व्यापारी