प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -“राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस अवमान अर्ज पुढील आठवड्यात दाखल करणार आहे,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
“दाखल असलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने दि. 11 मार्च 2021 ची प्रभाग रचना अंतिम ठेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश दिले आहेत. त्या तारखेला महापालिकेकडून 3 सदस्यांची प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेली होती. तसेच ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीत न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच पाच आठवड्यांची स्थगिती दिली आहे. असे असतानाही शासनाने विधानसभेमध्ये चारच्या प्रभागाच्या विधयकाला मान्यता दिली आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ असे जगताप यांचे म्हणणे आहे.
“चार सदस्य प्रभाग पद्धतीविषयी सर्वोच्च न्यायालयात आम्ही तीन अर्ज दाखल केले आहेत. मुळात निवडणुका वेळेत होणे आवश्यक होते. नवीन प्रभाग पद्धतीमुळे निवडणुका पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयात या विरोधात दाद मागण्यात आली आहे. यासंदर्भात याच आठवड्यात सुनावणी होईल, अशी अपेक्षा आहे,’ असे जगताप म्हणाले.