उत्सवाच्या खर्चातून गरजूंना मदत
वारजे (प्रतिनिधी) : वारजे येथील श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ व राजयोग प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर आयोजित करण्यात येणारा वार्षिंक श्री गणेश उत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कोरोना विषाणू मुळे रद्द करण्यात आला आहे. यावर्षी महिलांना केंद्रस्थानी ठेवून आठ दिवस नामवंत महिला किर्तनकरांची कीर्तने ठेवण्यात आली होती व त्याबरोबरच महिला म्रुदुंग वादक, महिला गायक अशा महिलांना प्राधान्य देण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांची तयारी हि झाली होती परंतु कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व लॉक डाऊन मुळे हे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी सांगितले.
या वर्षी श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ व राजयोग प्रतिष्ठान २६ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यामुळे महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मंडळाची कार्यकारिणी सुध्दा महिलांचीच करण्यात आली होती व या महिलांच नेतृत्त्व पुणे मनपा च्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्याकडे होते.
दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आपल्या सुश्राव्य किर्तनातुन समाजाला समाज प्रबोधनानने ज्ञानदानाचे कार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असतात. या वर्षी सदर कार्यक्रम २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान होणार होता. या नऊ दिवसीय कालावधीत रोज किमान दीड हजार च्या वर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. गेल्या वर्षी मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत असताना एक भव्य दिव्य मंदिराचा जिर्णोध्दार व कलशारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. या वर्षी कोरोना विषाणू चा हाहाकार व महाभयंकर रोगामुळे तसेच लाॅकडाऊन मुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचे सावट आलं आहे. त्यामुळे परंपरा असलेला हा अध्यात्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या संयोजन समितीने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या खर्चातून परिसरातील नागरिकांना गोरगरीब गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती धुमाळ यांनी दिली.