पुणे, -एअर एशियाच्या पुणे-बंगळुरू या विमानाला बुधवारी तब्बल दहा तासांपेक्षा जास्त उशीर झाला. त्यामुळे भल्या सकाळी 100 पेक्षा अधिक प्रवाशांचा खोळंबा झाला. ही फ्लाइट सुरुवातीला पहाटे 5:25 वाजता निघणार होती, त्यानंतर वारंवार वेळापत्रक बदलले गेले, ज्यामुळे प्रवासी निराश झाले आणि त्यांची गैरसोय झाली. अखेरीस या प्रवाशांसाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली.
बुधवारी पहाटे 5.25 वाजता या विमानाचे उड्डाण होणार होते, पण त्यानंतर अर्धा तास उशीर होणार असल्याचा मेसेज प्रवाशांना आला. तर, पुन्हा-पुन्हा असे मेसेज प्रवाशांना येत राहिले. यानंतर सकाळी 9:30 वाजता उड्डाण होण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही पुढील वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आले. त्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झाले. दरम्यानच्या काळात विमानतळ प्रशासन अथवा विमान कंपन्यांकडून कोणीही संवाद साधण्यास तयार नसल्याने प्रवाशांचा संयम संपला. त्यानंतर काही जणांनी उपाशीअसल्याचे सांगितल्यानंतर प्रशासनाकडून अल्पोपहार पुरवण्यात आला.
त्यानंतर बाधित प्रवाशांसाठी दुपारी 3:15 वाजता पर्यायी विमान देण्यात आले. हेदेखील जयपूरमार्गे बंगळुरूला जाणार होते. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, प्रवाशांना शांत करण्यासाठी विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान तैनात करण्यात आले होते. दरम्यान, झाल्या प्रकाराबद्दल एअर एशिया कंपनीने प्रवाशांची माफी मागितली असून, सदरील प्रकार तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झाला आहे. प्रवाशांना पर्यायी विमानसेवा उपलब्ध करण्यासह प्रवास भाड्याचे पूर्ण पैसे परत करणार असल्याचे सांगितले.