हिंगोली – येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली येथे २६ नोव्हेंबर रोजी रामलिला मैदानावर ओबीसी एल्गार मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात तायवाडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना तायवाडे यांनी मार्गदर्शन करतांना आमची लायकी काढण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला, आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत का येत आहेत. ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा असे वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याच्या तिव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणात आखाडा बाळापूर येथील उद्योगक दीपक दुर्गे यांनी आखाडा बाळापूर पोलिसांकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती. तर हिंगोली येथे पप्पू चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.
त्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे जमादार विकी उरेवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यात जनता अपराध करण्यास प्रेरीत होईल अशा प्रकारचे भाषण केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी बबनराव तायवाडे यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.