नगर -नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील अरविंद बनसोड व पुणे पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप या बौद्ध युवकांचा जातीय वादातून हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. या बौद्ध युवकांच्या हत्येचा खटला जलतगती न्यायालयात चालविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, किशोर कांबळे, प्रकाश कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, मिलिंद अंग्रे, निकेश कांबळे, सोन्याबापु सूर्यवंशी, शिवाजी भोसले, शंकरराव नगर आदी उपस्थित होते. जनता करोना महामारीच्या विळख्यात असताना देखील जातीयवादातून बौद्ध कुटुंबातील मुलांची हत्या करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील नितीन आगे, सागर शेजवळ, भोतमागे अशा अनेक प्रकरणात आरोपी निर्दोष सुटल्याने अशा पद्धतीने जातीयवादातून बौद्ध युवकांची हत्या होत असून, अपराध करण्याची वृत्ती देखील वाढत आहे.
खटला जलतगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, कायद्यांमध्ये काही तरतूद करून आरोपींना निर्दोष सोडले तर त्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात यावे. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्युब आदी सोशल मिडियावर काही समाजकंटक जे जातीय तेढ निर्माण करतात अशा समाजकंटकांवर सायबर सेलनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.