नवी दिल्ली – जम्मू काश्मीरातून स्थलांतरीत झालेल्या काश्मीर पंडितांपैकी 610 जणांना त्यांच्या तेथील मालमत्ता परत देण्यात आल्या आहेत अशी माहिती आज सरकार तर्फे राज्यसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, पंतप्रधान विकास पॅकेज-2015 अंतर्गत आत्तापर्यंत 1,080 कोटी रूपये काश्मीर पंडितांच्या पुनर्वसनासाठी खर्च करण्यात आले आहेत.
तसेच काश्मिरी स्थलांतरितांसाठी 3,000 राज्य सरकारी नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत.मंत्री म्हणाले की जम्मू आणि काश्मीर स्थलांतरित स्थावर मालमत्ता ( संरक्षण आणि विक्री प्रतिबंध) कायदा, 1997, अनुसार जम्मू आणि काश्मीरमधील संबंधित जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी हे स्थलांतरितांच्या स्थावर मालमत्तेचे कायदेशीर संरक्षक आहेत.
काश्मीर खोऱ्यात 80 च्या दशकात झालेल्या दहशतवादी कारवायांमुळे तेथून काश्मीरी पंडितांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. त्यांनी स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या मालमत्ता अन्य स्थानिकांनी बळकावण्याचा प्रकार तेथे घडला आहे. या मालमत्ता पुन्हा परत मिळाव्यात यासाठी गेले अनेक दिवस काश्मीर पंडित प्रयत्नशील आहेत.