पुणे- राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाचे (एनआरडीसी) लोकसंपर्क केंद्र आघारकर संशोधन संस्थेत स्थापन करण्यात आले आहे. येथून एकस्व अधिकार, स्वामित्व हक्क, व्यापारचिन्ह दाखल करणे, स्टार्टअप, उत्पादन, उत्पादन संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आदी कामे केली जाणार आहेत. याद्वारे नवउद्योग, संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून ही स्थापना करण्यात आली आहे. याबाबत “एनआरडीसी’चे संचालक शेखर मुंदडा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी यांनी ही माहिती दिली.
देशातील तिसरे केंद्र
दिल्ली येथील मुख्य कार्यालयासह विशाखापट्टणमनंतर पश्चिम भारतातील पुण्यात केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर ईशान्य भारतासाठी गुवाहाटीमध्ये केंद्र स्थापन करण्याचे नियोजन आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत भर
गेल्या पाच वर्षांत दोन हजार तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले. त्यामुळे सुमारे 4500 कोटी रुपयांची भर देशाच्या अर्थव्यवस्थेत पडली आहे. करोना काळात व्यवसायावर परिणाम झाल्यानंतर उद्योगांचा प्रतिसाद वाढला आहे.
“एनआरडीसी’चे कार्य काय?
राष्ट्रीय संशोधन व विकास संस्था प्रामुख्याने विद्यापीठे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व हस्तांतरण करते. शिवाय रसायने, कृषी आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, जैवविज्ञान, यांत्रिकी, विद्युत आदी क्षेत्रातील विक्रीयोग्य औद्योगिक उत्पादने आणि सेवांमध्ये संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते.
पुण्याची निवड का?
शैक्षणिक संस्था, उद्योगांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसंपर्क केंद्राद्वारे नवउद्योजकांना, संशोधकांना, उद्योगांना, शैक्षणिक संस्थांना फायदेशीर ठरेल.
उद्योग क्षेत्रातील आधुनिक संशोधन आणि नवोपक्रमांच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. शिवाय येथे पुरेसे मनुष्यबळदेखील आहे. आघारकर संशोधन संस्थेसोबत आम्ही करार केला आहे. त्यानुसार येथून कामकाज चालेल. लवकरच येथे इन्क्युबेशन सेंटरही सुरू केले जाणार आहे.
– शेखर मुंदडा, संचालक, “एनआरडीसी’