पुणे (प्रतिनिधी)– करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले आहे. त्यात उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कंपनी बंद असल्यामुळे कच्चा मालाची मोठी अडचण निर्माण झाली आहे, त्याचबरोबर मजूर उपलब्ध नसल्याने कंपनी सुरू झाली तरी पुर्वीसारखे उत्पादन सुरू व्हायला पुढील सहा महिने तरी थांबावे लागणार आहे. अशी खंत उत्पादन क्षेत्रातील काही उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन सुरू जाहीर करून आता अडीच महिने झाले आहेत.आता राज्य शासनाने उद्योग व्यवसाय सुरू करण्यास काही अटींवर परवानगी दिल्याने कंपन्या आता सुरू व्हायला लागल्या आहेत. अडीच महिन्यानंतर कंपन्या सुरू झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यात सर्वात महत्वाची अडचण निर्माण झाली आहे ती कच्चा मालाची. कारण अनेक वेळा हा कच्चा माल खराब होत असतो. तो ठराविक काळातच वापरला जावो लागतो पण आता अडीच महिने कंपनी बंद असल्यामुळे हा माल टिकून राहणे अशक्य आहे. गेले अडीच महिन्यांपासून बंद असणारी मशीन आणि उपकरणे आता पुन्हा सुरू करण्यासाठी त्याची दुरूस्ती आणि देखभाल करावी लागणार आहे.त्यात पुढील पंधरा दिवस जाणार आहेत.तो खर्च वेगळाच होणार आहे म्हणजे कंपनी सुरू करून सुद्धा लगेच उत्पादन घेतले आणि पैसे आले असे होणार नाही.
यासंदर्भात अधिक माहिती देताना उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ विशाल पवार म्हणाले,मजूर आणि वाहतूकीची सगळ्यात मोठी अडचण येणार आहे आता जे मजूर गावी गेले आहेत ते दिवाळी नंतरच पुन्हा येतील तोपर्यत तर अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कंपनी चालवावी लागणार आहे आणि तीच स्थिती चालकांची आहे, ते सुद्धा गावी गेले आहेत.त्यामुळे वाहतूक व्यवसाय अनेक ठिकाणी बंद आहे.कंपनी सुरू झाली तरी पुढील तीन महिने तरी मालाची ऑर्डर मिळणे अवघड आहे.आधीच अडीच महिने काहीच उत्पन्न नाही त्यातून आता आगामी काळात सुद्धा ऑर्डर मिळणार नसल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न उत्पादन क्षेत्राला पडला आहे.
केंद्र सरकारने उद्योग क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर केले असले तरी ते मिळणारे पैसे हे कर्ज स्वरूपातच आहेत, त्यामुळे आधीच कंपनीवर कर्ज असताना आता सरकारकडून आणखी कर्ज स्वरूपात पैसे घेऊन कंपनी सुरू करणे थोडे मुश्किल वाटत आहे.उत्पादन क्षेत्र सुरू झाले तरी त्याला गती आणि चालना ही मिळायला डिसेंबर उजडणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले,