पुणे – राज्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. परंतु कुठेही विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेत सर्व नियम पाळून खासगी शिकवणी वर्गांनाही परवानगी दिली जावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
फोरमचे अध्यक्ष बंडोपंत भुयार व सचिव रफिक शेख यांनी निवेदनाद्वारे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेही केली. लॉकडाऊनपासून राज्यातील खासगी शिकवण्या बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दि. 23 नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शाळांमध्ये नियमितपणे जात आहेत. परंतु, नव्याने कोणाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले नाही. म्हणजेच पुरेशी दक्षता घेऊन व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून शाळा व खासगी शिकवणी वर्गही व्यवस्थित चालू शकतात, असे भुयार यांचे म्हणणे आहे.