नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून (4 state election result) भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे, हे सिद्ध होते. आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू, अशी पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट करत जनतेचे आभार मानले आहे.
जनतेला माझा प्रणाम ! भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू, अशी पोस्ट मोदी यांनी शेअर केली आहे.
या निमित्ताने मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली, ते अतिशय कौतुकस्पद आहे. विकसित भारताचे ध्येय घेऊन आपण पुढे जात आहोत. आपल्याला थांबायचे नाही, खचून जायचे नाही तर भारताला विजयी करायचे आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे, असे मतही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केले आहे.
तेलंगणाच्या जनतेचेही त्यांनी आभार मानले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक करतो, असे त्यांनी म्हटले.