रांची – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झारखंडच्या देवघर इथे, 16,800 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या सर्व प्रकल्पांमुळे झारखंडमध्ये दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधा, ऊर्जा, आरोग्य, श्रद्धास्थाने आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या 8 वर्षात झारखंडला महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग या सर्व मार्गांनी जोडण्याच्या प्रयत्नामागेही, हाच विचार आणि तत्व प्राधान्याने आहे. या सर्व सुविधांचा राज्याच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज झारखंडला दुसरे विमानतळ मिळाले आहे. यामुळे बाबा बैद्यनाथ यांच्या भक्तांची मोठी सोय होणार आहे. देवघर ते कोलकाता या मार्गावर आजपासून विमान सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विमानतळाच्या उभारणीसाठी अंदाजे 400 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच, रांची, दिल्ली आणि पाटणासाठीही लवकरच विमानसेवा सुरू होतील, अशी माहिती दिली. बोकारो आणि दुमका इथेही विमानतळे बांधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रसाद’ योजने अंतर्गत बाबा बैद्यनाथ धाममध्ये आधुनिक सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान 10,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते प्रकल्पांची कोनशीला रचली. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील गोरहार ते बरवाडा या टप्प्याचे सहा पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -32 वरील राजगंज- छास ते पश्चिम बंगालच्या सीमा भागापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण अशा अनेक कामांचा समावेश आहे.
“गेल’च्या जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धामरा पाइपलाइनच्या झारखंडमधील बोकारो-अंगुल विभागामार्फत ओदिशाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून एवढ्या मोठ्या कालावधीनंतर राज्यातील 18 हजार गावांपैकी ज्या गावांचे विद्युतीकरण झाले त्यापैकी बहुतांश दुर्गम आणि अतिदूर वसलेली आहेत, असेही पंतर्प्रधानांनी सांगितले.