नवी दिल्ली – देशामध्ये सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढू लागले आहे. सेंद्रिय कृषी उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी आता देशामध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळा उभारण्याचे काम अमूल ही संस्था करणार आहे.
सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या चाचण्या घेऊन या उत्पादनांना प्रमाणित करण्याचे काम या प्रयोगशाळा करतील. त्यामुळे देशातील ग्राहकांना खात्रीने ही उत्पादने मिळतील. त्याचबरोबर या उत्पादनांची निर्यात करणे सोपे जाईल असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले. त्यामुळे सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
परवा जागतिक सहकार दिनाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, या प्रयोगशाळाच्या उभारणीचे काम अमूल योग्य प्रकारे पार पाडेल याबद्दल मला विश्वास आहे. यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत किमान 30 टक्के अधिक लाभ मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अमूलच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली सहकारी संस्था इतर सहकारी संस्थांच्या मदतीने देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये माती आणि सेंद्रिय उत्पादनाच्या परीक्षणासाठी एक प्रयोगशाळा उभी करणार आहे. त्याचबरोबर दोन मोठ्या सहकारी निर्यात संस्था उभारण्यात येतील. या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांची उत्पादने निर्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर देशातील बियाणे उद्योग विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. देशामध्ये लाखो प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्था आहेत. या संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याच्या शक्यता खुल्या होणार आहेत. भारतासारख्या देशांमध्ये सहकाराच्या माध्यमातून विविध घटकांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. या दृष्टिकोनातूनच सरकारने सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे ते म्हणाले.