मंचर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी समजलाच नाही, त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अपेक्षा धरण्यात अर्थच नाही. या शब्दात केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकुमशाही कारभाराची कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (दि. 23) खिल्ली उडविली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना मंचर (ता. आंबेगाव) येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकाराशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून केंद्र सरकार शेतकरी संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कॉंग्रेसच पार पाडणार असून त्यासाठी 3 ते 12 सप्टेंबर राज्यभर पदयात्रा केली जाणार आहे.
कार्पोरेट सेक्टरला फास लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. कांदा तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना अक्षरशा माल फेकून द्यावा लागत आहे. सरकारची धोरणे याला कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस ठामपणे उभी आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल होण्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवणार असून, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. मागणी करूनही सरकारने चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. सरकार याबाबत गंभीर नसल्याचे ते म्हणाले.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, गणेश खानदेशे यांनी मनोगत व्यक्त केले. लाला बॅंकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी स्वागत केले. यावेळी संचालक रामदास बाणखेले, डॉ. मंगेश बाणखेले, जे. के. थोरात, कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, पक्ष निरीक्षक दादू खान, अजित दरेकर, जमीर काझी, माजी सरपंच कैलास गांजाळे, अल्लू इनामदार, दिलीप बाणखेले, सुभाष खानदेशे उपस्थित होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी प्रास्ताविक केले. कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांनी आभार मानले.