कोल्हापूर, प्रतिनिधी- सातबारा कोरा करण्यास वेळ लागत असेल तर सरकारने तातडीने सर्व थकित कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय पाटील यांनी आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन महाविकासआघाडी सरकारने दिले आहे. शेती क्षेत्रातील संकटामुळे शेतकऱ्यांची मध्यम मुदतीची कर्जे थकली आहेत. या कर्जाच्या वसुलीसाठी मध्यवर्ती बँका, सोसायट्या शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत. हप्ते थकले असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. बँकांनी पीक कर्जाच्या कमाल मर्यादा पत्रकानुसार पीक कर्जे मंजूर केली असली तरी इतर कर्जांचे हप्ते थकले असल्यामुळे मंजूर कर्जेही वितरित केली जात नाहीत.
पीक कर्ज अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते अडवून ठेवणे शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकणारे असल्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो. हे संकट टाळण्यासाठी सर्व थकित कर्जाच्या वसुलीला तातडीने स्थगिती द्यावी तसेच पीक कर्ज वितरित करण्याची व्यवस्था करावी. स्थगितीचा आदेश सर्व बँकांना तातडीने दिला जावा अशा मागण्याही या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.