विजय शिंदे
वडापुरी – नव्या युगाच्या अस्सल शेतकऱ्याच्या नजरेतून विषम वातावरणातील प्रतिकूल बदलांचा वेध घेत, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण आणि उच्चशिक्षित शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून 71 टन 200 किलो उत्पादन घेत, 1 कोटी 23 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.
दीपक गुरगुडे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून बाभूळगाव येथील आपल्या शेतजमिनीपैकी पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. अनुकूल वातावरणाचा सहज फायदा घेण्याबरोबरच प्रतिकूल वातावरण, आपल्या बुद्धिचातुर्य व अथक परिश्रमातून अनुकूल करून घेत, शेती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दीपक गुरगुडे यांनी शिक्षण घेऊन “साहेब’ बनावे ही त्यांच्या आई-वडिलांची इच्छा. त्यांना मान देऊन दीपक यांनी एम. ए. बीपीएड. पर्यंत शिक्षण घेतले; मात्र साहेब न होता भीमा नदीच्या तीरावर शेती करावी, असा निर्णय घेतला.
दीपक गुरगुडे म्हणाले की, मुळातच डाळिंब हे उष्ण कटिबंधातील कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्याची पाण्याची गरज पाहता योग्य नियोजन केले तर ते शेतकऱ्यांना दुष्काळातून तारून नेणारे पीक ठरू शकते. या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे योग्य ठरते. सेटिंगमध्ये काळात या पिकाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तरुण शेतकऱ्यांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी. तिच्याकडे व्यवसाय म्हणून लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्राची प्रत तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
यंदा 11 एकरांवर उत्पादन करणार
गुरगुडे यांच्या शेतातील डाळींब पिकाचे 71 टन उत्पादन झाले असून त्यापैकी 35 टन डाळिंब बांगलादेशात, 20 टन डाळिंब दुबईत, 16 टन डाळिंब दिल्ली येथे निर्यात झाले असल्याची माहिती दीपक गुरगुडे यांनी दिली. यास दिडशे ते 200 रुपये किला असा दर मिळाला. त्यामुळे उत्साह द्विगुणीत झाला असून यंदा अकरा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय दीपक यांनी घेतला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर व शेळगाव येथील ब्रह्मदेव दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षणामुळे शेतीची वाट समृद्ध
परिसरात सहकारी व खासगी साखर कारखाने असताना ऊस पिकाचे मोठे उत्पन्न घेतले जात होते; परंतु दीपक यांनी पारंपारिक ऊस पिकाला बगल देऊन डाळिंब पिकाचा विचार करून उत्पन्न वाढवले. यापूर्वी कर्नाला येथे शास्त्रोक्त दूधनिर्मितीचे शिक्षण घेतले. कोइमतूर येथे ऊस पैदास केंद्राचे प्रशिक्षण घेतले. पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतर्गत इंदापूर व बाभूळगाव येथे घेतलेल्या प्रशिक्षणामुळे शेतीकडे जाणारी त्यांची वाट समृद्ध झाली.
कृषिभूषण पुरस्काराने सन्मान
आपण इस्त्रायल पद्धतीने डाळिंबाची शेती करत आहोत. सघन पद्धतीने लागवड केली आहे. पाच एकरांत 3 हजार 400 झाडे आहेत. औषध फवारणीसाठी जपानी पद्धतीच्या स्प्रेइंग मशीनचा वापर करण्यात येत आहे. सलग चार वर्षे डाळिंबाचे उत्कृष्ट उत्पन्न घेतल्याने, दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या दौंड कृषी महोत्सव 2013 मध्ये कृषिभूषण सन्मान देऊन दीपक गुरगुडे यांना सन्मानित करण्यात आले होते.