सहकारनगर – व्यक्तीचा मृत्यु झाल्यास वैकुंठ स्माशनभूमी अथवा अत्यंविधीच्या ठिकाणी मृतदेह नेण्याकरिता पीएमपीकडून चार पुष्पक बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्यापैकी एकच बस सुरू आहे. ती ही कधीतरी उपलब्ध होते. यातून दु:खद प्रसंगी नागरिकांची गैरसोय होत असून अशा बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलकडून करण्यात आली आहे, यासंदर्भात पीएमीपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अध्यक्ष नितीन कदम यांनी निवेदन दिले आहे.
पुणे शहरातील स्माशनभुमी अथवा अत्यंविधीच्या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी तसेच आप्तस्वकियांना जाण्याची सुविधा म्हणून पीएमपीएमएलने चार पुष्पक बसेसची सोय केली होती. परंतु, काही दिवसांपासून संपुर्ण पुणे शहरासाठी चार पैकी एकच पुष्पक बस उपलब्ध असल्याने दु:खद प्रसंगी गरजू गोरगरिबांसह सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता पुष्पक बस अपुरी पडत आहे.
शहराची लोकसंख्या जवळपास 50 लाखांच्या पुढे आहे. पालिकेची 15 क्षेत्रिय कार्यालये आहेत, यानुसार पुष्पक बसेसची संख्या किमान 15 असणे आवश्यक आहे. सदर समस्या लक्षात घेऊन अशा बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलकडून करण्यात आली आहे. निवेदन देताना. स्वप्निल दुधाने, स्वप्नील खडके, फईम शेख, अश्विनी जाधव, संजय कुरकुटे आदी उपस्थित होते.