पुणे -शहरातील वाढते तापमान आणि त्यातच सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेषत: नोकदार कर्मचारी महिलांची, ज्येष्ठ नागरिकांची मोठीच तारांबळ उडाली. शहर आणि उपनगरांतील बहुतांशी मार्गांवर पीएमीपीचे बसथांबेच नसल्याने उघड्यावर थांबणाऱ्या प्रवाशांना पावसात भिजतच बसची वाट पहावी लागली. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यातून पीएमपीने जुने बसथांबे काढण्यात आल्यानंतर नवे बसथांबे उभारलेच नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
शहर, उपनगरांतील मुख्य मार्गांवरील जुने बसथांबे काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे, अत्याधुनिक सुविधा असलेले नवे बसथांबे उभारण्याचा संकल्प पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला होता. जाहिरातदारांच्या सहकार्यातून नवे थांबे उभारण्यात येणार येणार होते. मात्र, प्रत्यक्षात मागील चार वर्षांपासून सहा वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पीएमपीने बसथांब्यांच्या नियमावलीतच बदल करण्याचा निर्णय घेतला. जाहिरातदार, ठेकेदारांच्या सूचनांचा विचार करून नव्या नियमात बदल करण्यात आल्याने आता चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अशा पीएमपीला आहे. परंतु, बसथांबे बांधून पूर्ण होण्यास सप्टेंबर 2023 उजाडणार असल्याने यंदाच्या उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावरच थांबावे लागणार आहे.
गरज 9000ची उपलब्ध 1320 थांबेच…
पीएमपीचे कार्यक्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए असे तिन्ही क्षेत्र मिळून येणारे व जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गांनुसार पीएमपीकडे सुमारे नऊ हजार बसथांब्यांची नोंद आहे. परंतु, केवळ 1320 ठिकाणीच छत असलेले थांबे आहेत. “बीआरटी’च्या 120 थांब्यांचा समावेश आहे. बसथांबे सारखी सुविधा उपलब्ध करून देण्यातही पीएमपीला अपयश येत आहे. निधीची कमतरता असून प्रशासन जाहिरातदार मिळत नसल्याचे कारण देत आहे.
…असे केले बदल
पीएमपीने 2020-21मध्ये 1500 बसथांब्यांसाठी निविदा प्रसिद्ध केली, त्यांनतर पुन्हा 1500 व दोन वेळा 600 बसथांब्यांची निविदा निघाली. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत 300 बसथांब्यांसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, यासाठी मुदतवाढ करण्यात आल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, बीओटी तत्त्वावर स्टेनलेस स्टीलचा बसथांबा उभारावा. एक बसथांबा बांधण्यासाठी चार लाख खर्च मर्यादा, बसथांब्यांची मालकी 15 वर्षांनंतर पीएमपीकडे असणार, पीएमपीला बसथांब्यातून मिळणाऱ्या जाहिरातीच्या उत्पन्नात आता वार्षिक दरवाढ 10 ऐवजी सहा टक्के, असे बदल करण्यात आले आहेत.
सप्टेंबरपर्यंत चालणार काम…
नव्याने निविदा प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होणार आहे. निविदा मंजुरीनंतर संबंधित ठेकेदाराने कराराच्या तारखेपासून 45 दिवस ते 90 दिवसांत पहिले 100 बसथांबे आणि त्यानंतर आणखी 100 बसथांबे उभारणे, तर शेवटच्या टप्प्यात 135 ते 180 दिवसांत उर्वरित 100 बसथांबे बांधणे उभारण्याची डेटलाइन देण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे. तोपर्यंत बसथांबे उभे राहणे कठीण असल्याने प्रवाशांची गैरसोय ठरलेली असल्याचे यावरून दिसते.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या बसथांब्यांच्या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता, या कारणातून आता निविदेतील नियमांत योग्य तो बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असे वाटते. त्यानंतर बसथांब्याचे काम वेगाने होईल.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल