- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
- भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक
पिंपरी – महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी समाजाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. भाजपाच्या काळात खावटीचे कर्ज रद्द केले होते. सुमारे 175 कोटी रुपयांचे आदिवासी बांधवांवरील कर्ज आम्ही माफ केले होते. पण, आताच्या सरकारचे खावटीबाबत धोरण काय आहे? आदिवासींच्या खात्यात 4 हजार रुपये जमा करण्याची योजना असताना, सरकारने वस्तू खरेदी करुन आदिवासी बांधवांना देऊ, अशी भूमिका घेतली. महाविकास आघाडीला खरेदीमध्ये स्वारस्य आहे. चुकीचा माल खरेदी करु आणि मलिदा लाटू, अशी भूमिका सरकारची आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी मोर्चातर्फे शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी कार्यसमिती बैठक आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश दुर्वे, संघटनमंत्री विजय पुराणिक, महामंत्री श्रीकांत भारतीय, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोक उईके, महापौर उषा ढोरे, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. भारती पवार, खासदार अशोक नेते, माजी आमदार वैभव पिचड, प्रदेश सचिव अमित गोरखे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आदिवासी समाजाला कालांतराने शिक्षणापासून वंचित ठेऊन मागासलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या काळात करण्यात आला.
कुपोषण-मागासलेपणामुळे प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा असतानाही आदिवासी समाज दुर्लक्षित राहिला. राज्यात भाजपाचे सरकार असताना आदिवसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. दरम्यान, भगवान बिसरा मुंडा जन्मदिवस आदिवासी दिन घोषित करण्याबाबत राज्य सरकारला विनंती करण्यात येणार आहे. तसा ठराव कार्यकारिणीमध्ये पारित करण्यात आला.
भाजपामुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची संधी
प्रत्येक वर्षी आदिवासी समाजातील 25 हजार मुले शहरातील इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील, अशी व्यवस्था भाजपा सरकारच्या काळात करण्यात आली आहे. आदिवासी मुलांसाठी सेंट्रलाइज किचन, पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष स्वयं योजनेतून गणवेश, शैक्षिणिक साहित्य, राहण्याची व्यवस्था आदीसाठी मदत, पेसा ग्रामपंचायत निर्णयामुळे आदिवासी गावांचा विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अनेक योजना भाजपाने सुरू केल्या आहेत. आदिवासी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे आहेत. त्यामध्ये दुप्पट पट्टे समाजाला दिले आहेत.
तसेच, पट्टेधारक आदिवासी यांना शेतकऱ्यांची योजना लागू केल्याची माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिली. आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी आगामी काळात प्रसंगी रस्त्यावर उतरुन भाजपा आंदोलन करेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.