खटाव -जिहे कटापूर योजनेद्वारे दुष्काळी भाग म्हणून असलेला खटावचा शिक्का कायमचा मिटवणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ग्रामीण आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे खटावच्या वैभवात केवळ भरच नाही पडणार तर सर्व सोयीसुविधामनीयुुक्त आरोग्य केंद्र उभे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विशेष पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, “करोना काळातच आरोग्याचं महत्त्व जाणवू लागले.
आरोग्य सुधारणेवर भर देण्यासाठी ग्रामीण आरोग्य सुधारणेला महत्त्व दिले आहे. मात्र, अजूनही करोना गेलेला नाही. सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. ऑक्सिजनचे खरे महत्त्व करोना काळात कळले. त्यामुळे वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे.’ जिल्हा बॅंकेचे काम आदर्शवत आहे, असे सांगून 8ी. पवार यांनी कार्यकर्ता लगेच तयार होत नसतो त्यासाठी कामच करावं लागतं.
मीसुद्धा नवीन असताना पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच आज तुमच्यासमोर उभा आहे. कार्यकर्ता एकदम निर्माण होत नाही, माणसामध्ये मिसळून जमिनीवर पाय ठेवून कार्य करावे लागते. नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आमच्यात काय कमी होतं काही माहित नाही. पण खटावकरांनी मागील निवडणुकीत दगा दिला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “पराभव हा पराभव असतो. तो मोठेपणाने मान्य करायचा असतो. कार्यकर्ता कधी संपत नाही. तो उभा राहिला पाहिजे. मी सदैव पक्षासोबतच आहे. जिथे अन्याय दिसेल तिथे मी कार्यकर्त्यासोबतच असेन.’ खासदार श्रीनिवास पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला. पक्ष तुमच्यासोबत ठाम असेल हेही आपल्या वेगळ्या शैलीत सांगितले.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे भाषण झाले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. सागर साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी सुरेंद्र गुदगे, मंगेश धुमाळ, मानसिंग जगदाळे, शहाजी क्षीरसागर, बंडा गोडसे, तेजस शिंदे, इंदिरा घार्गे, सुनीता कचरे, बाळासाहेब सोळस्कर, ब्रह्मा पैलवान, वनिता गोरे, जयश्री कदम, शिवाजी सर्वगोड, नितीन पाटील, उपनगराध्यक्ष नंदा बर्गे, मनोज देशमुख, रमेश शिंदे, रसूल मुल्ला, मनोहर लावंड, किशोर डंगारे, दिलीप जाधव, मुगुटराव पवार, किरण राऊत, संजय शहा, जयदीप शिंदे, सुरज देशमुख, सतीश शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व खटाव परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.