इंद्रायणीनगर, दि. 30 (वार्ताहर) -अठराविश्वे दारिद्रय पाचवीला पूजलेले, त्यामुळे हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न पाहणे दुरापास्त, त्यांच्यासाठी जमिनीचे अंथरुण आणि आकाशाचे पांघरुण, असे कित्येक वर्षापासून ते भोसरी येथील उड्डाणपुलाच्या आश्रयाला आयुष्य कंठत आहेत. परिस्थितीपुढे नतमस्तक होणाऱ्या या बेघरांपर्यंत सरकारी योजना पोहोचणार का? असा सवाल उपस्थित होत असून कशी नशिबानं थट्टा आज मांडली अशी म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा. यातील अन्न व वस्त्र या गरजा कशाबशा पूर्ण होऊ शकतात. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. आठराविश्वे दारिद्य्राचे जीवन जगणाऱ्यांना निवाऱ्यासाठी उड्डाणपुलासारख्या ठिकाणांनचा आसरा घ्यावा लागतो.
शासकीय योजनांचा भडीमार करत घरासाठीच्या विविध योजना राबविल्या जातात. तरीही उड्डाणंपुलाचा आश्रय घेऊन रात्र काढावी लागणाऱ्या बेघरांच्या व्यथा सुन्न करणाऱ्या आहेत. शहरातील चिंचवड, भोसरी, निगडी, कासारवाडी, डांगे चौक, नेहरूनगर येथील उड्डाणपुलाखाली व मोकळ्या जागेत अनेकांनी आपले संसार थाटल्याचे वास्तव दिसत आहे. हक्काचा निवारा नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे या मंडळींनी आसरा घेतला आहे. केंद्रशासन व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना व म्हाडाच्या विविध योजनांतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.
शासकीय बाबींची पूर्तता करणाऱ्या ठरावीक नागरिकांना सोडत पद्धतीने घरे दिली जात आहेत. मात्र तरीही आजतागायत बेघर असणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करणाऱ्यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. शहरातील बहुतांशी मोकळ्या जागेवर झोपडपट्ट्या तयार होतात. अशा झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर शासनाकडून मिळावे, अशी अपेक्षा आहे. शहरातील काही जुन्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करून येथील रहिवाशासाठी नवीन गृहप्रकल्प उभारण्याचे काम अजूनही बाकी आहे. स्मार्ट सिटीत शहराचा प्रथम क्रमांक असावा यासाठी शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, आशा चर्चा होतात. मात्र, यासाठी आवश्यक असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर येत आहे. शहरातील मोकळ्या जागा व अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.