न्यूयॉर्क : संपूर्ण जग अजूनही कोरोनाशी लढत आहे. याच दरम्यान लसीकरणाला गती देऊन विषाणूला संपवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. अशातच कोरोना प्रतिबंधक लसींच्या परिणामकतेच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत.
अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांना फाइजर आणि मॉडर्नाची लस देण्यात आली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. अभ्यासानुसार या लसींमुळे लोकांमध्ये कोरोना लक्षणांची तीव्रता आणि संसर्ग कालावधी कमी होतो. हा अभ्यास 30 जून रोजी ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ मध्ये प्रकाशित झाला आहे.
फायझर आणि मॉडर्नाच्या एमआरएनए लसीमध्ये लोकांच्या पेशींसाठी सार्स-सीओव्ही -2 चे स्पाइक प्रोटीन बनवण्यासाठी अनुवांशिक शक्ती आहे. विषाणू मानवी पेशींमध्ये संक्रमित आणि प्रवेश करण्यासाठी सार्स-सीओव्ही -2चा वापर करते.
फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यातील कोरोना संसर्गाचा धोका व त्याचे प्रमाण किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासाचे सहलेखक सारंग यून यांनी याबाबत सांगितले की, ‘जे लोक दररोज कोरोना विषाणूच्या संपर्कात येत आहेत आणि त्यांना फायझर आणि मॉडर्ना या दोन लसींच्या डोसनी या आजारापासून वाचवले.
ज्यांना दुर्दैवाने लसीकरण केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्या लोकांची प्रकृती लस न घेतलेल्या कोरोनाग्रस्तांपेक्षा चांगली आहे, असे या अभ्यासात आढळून आले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 91 टक्क्यांनी कमी झाला आहे. म्हणजेच या दोन्ही लसी कोरोना विषाणूविरोधात लढण्यास 91 टक्के प्रभावी असल्याचा निष्कर्ष अभ्यासात काढण्यात आला आहे.
लसीच्या पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर संसर्गाचा धोका 81 टक्क्यांनी कमी झाला आहे. अभ्यासात 3,975 लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यापैकी केवळ 204 म्हणजेच पाच टक्के लोकांमध्ये सार्स-सीओव्ही -2 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. हाच संसर्ग कोविड-19 च्या संसर्गाला कारणीभूत असतो. यापैकी 156 लोकांचे लसीकरण करण्यात आले नव्हते.
ज्या लोकांना पूर्णपणे किंवा अंशतः लसी देण्यात आल्या होत्या, त्या लोकांमध्ये लसी न घेतलेल्या लोकांपेक्षा संसर्गाची सौम्य लक्षणे आढळली. ज्या लोकांचे लसीकरण केले गेले व तरीही विषाणूची लागण झाली आहे, त्यांना तापाचा धोका 58 टक्के कमी झाला आहे. तसेच अंथरुणावर आजारी पडून राहण्याच्या दिवसांत 60 टक्के घट झाली आहे.