भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनामुळे अभिनय क्षेत्रातील कोहिनूरचा अस्त झाला आहे असेच म्हणावे लागेल. गेली कित्येक दशके आपल्या अभिनयाच्या मोहिनीने अनेक पिढ्यांना मोहून टाकणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे.
अर्थात, गेल्या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अभिनयापासून दिलीपकुमार अलिप्त असले तरीही टीव्ही वाहिन्यांवर दिलीपकुमार यांचे चित्रपट दाखवले जात असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अभिनयाचा आनंद मिळतच होता. 2000 सालाच्या आसपास जन्माला आलेल्या नव्या पिढीला कदाचित दिलीपकुमार यांचे महत्त्व कळणार नाही, पण यापूर्वीच्या कित्येक पिढ्यांना आपल्या अभिनयाच्या जोरावर मंत्रमुग्ध करणाऱ्या दिलीपकुमार यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. आणखी एक महान अभिनेते आणि या शतकाचा महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे- दिलीपकुमार यांच्या निधनामुळे एक अभिनयाच्या संस्थेचा अंत झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी अत्यंत योग्य शब्दांत दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे. कारण जेव्हा मुंबई किंवा चित्रपटसृष्टीशी संबंधित कोणत्याही शहरांमध्ये अभिनय शिकवणाऱ्या व्यावसायिक संस्था उपलब्ध नव्हत्या त्यावेळी दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहूनच अनेकांनी अभिनयाचे धडे गिरवून पडद्यावर पदार्पण केले होते, हे वास्तव आहे. आपण दिलीपकुमार यांच्या अभिनयाची नक्कल करतो हे कोणी लपवतही नव्हते हे सर्वात महत्त्वाचे.
दिलीपकुमार यांच्या अभिनयाच्या पायावरच राजेंद्रकुमार, मनोजकुमार, अमिताभ बच्चन आणि आधुनिक काळातील शाहरूख खान यांची अशी एक पिढी तयार झाली ज्यांच्या अभिनयावर दिलीपकुमार यांच्या अभिनयाचा पगडा होता. खरे तर चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिताना नेहमीच दिलीप, राज आणि देव या तीन अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. या त्रिकुटातील राज कपूर आणि देव आनंद यांनी काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला असला तरी दिलीपकुमार यांच्या निमित्ताने मात्र त्या त्रिकुटाची आठवण कायम राहिली होती. एकाच वेळी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या या तीन अभिनेत्यांपैकी दिलीपकुमार मात्र फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळखले गेले. “ट्रॅजेडी किंग’ हा त्यांच्यावर बसलेला शिक्का शेवटपर्यंत कायम राहिला. “देवदास’सारख्या शोकांतिका चित्रपटांनी दिलीपकुमार यांच्यावरील हा शिक्का जरी अधिक गडद केला असला, तरी दिलीपकुमार यांच्या अभिनयाची कारकीर्द अष्टपैलू प्रकाराची होती आणि सर्वच प्रकारच्या अभिनयात ते माहीर होते.
आपल्या दीर्घ अशा चित्रपट कारकिर्दीमध्ये दिलीपकुमार यांनी जे निवडक विनोदी चित्रपट केले त्या चित्रपटात त्यांनी सहज सुंदर असा विनोदी अभिनय केला आहे. तो पाहिला तर आजच्या नव्या पिढीतील कॉमेडी कलाकारांनाही काही निश्चितच हाती लागू शकेल. “कोहिनूर, आजाद किंवा राम और शाम’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिलीपकुमार यांच्या भूमिका हसत्या खेळत्या आणि विनोदी स्वरूपाच्या होत्या. “कोहिनूर’ चित्रपटामध्ये त्यांनी आरशासमोर जो अभिनय केला आहे तो विनोदी अभिनयाचे असे
सर्वोत्कृष्ट उदाहरण मानावे लागते. नंतरच्या पिढीला अमिताभ बच्चन हे “अँग्री यंग मॅन’ म्हणून माहीत असले तरी त्यापूर्वी खूप वर्षे आधी “नया दौर’ किंवा “गंगा जमुना’ यासारख्या चित्रपटांतून दिलीपकुमार यांनी वेगळ्या स्वरूपाच्या “अँग्री यंग मॅन’चे दर्शन घडवले होते, हेसुद्धा विसरता येणार नाही. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे माणसाच्या रोजीरोटीवर होणारा परिणाम आणि बेरोजगारी हा विषय हाताळणाऱ्या “नया दौर’ या चित्रपटामध्ये दिलीपकुमार यांनी ज्या प्रकारे यंत्रांना विरोध करणाऱ्या एका सामान्य टांगेवाल्याची भूमिका केली ती निश्चितच लक्षणीय होती. “गंगा जमुना’ सारख्या चित्रपटांमध्ये केवळ परिस्थितीमुळे डाकू बनायला लागणाऱ्या “गंगा’चे वेगळे दर्शन दिलीपकुमार यांनी चाहत्यांना घडवले होते.
देवदास, मधुमती यासारख्या चित्रपटांमध्ये एखादा हळवा प्रेमिक ज्या सहजतेने ते साकारत होते त्या सहजतेने त्यांनी “नया दौर’, “गंगा जमुना’ या चित्रपटांतील “अँग्री यंग मॅन’ किंवा “कोहिनूर’, “आजाद’ आणि “राम और शाम’मधील हसता खेळता नायक साकारला होता. एक नायक म्हणून कारकिर्दीच्या शेवटच्या कालावधीमध्ये “बैराग’ या चित्रपटात त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती. या तिहेरी भूमिकेमध्ये त्यांच्या तीनही भूमिका अभिनयाचं आदर्श दर्शन घडवणाऱ्या होत्या. या चित्रपटानंतर एक नायक म्हणून दिलीपकुमार यांनी विश्रांती घेतली असली तरी त्यांच्या अभिनयाच्या शाळेत शिकणाऱ्या मनोजकुमार यांनी आपल्या “क्रांती’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिलीपकुमार यांच्या अभिनयाची दुसरी इनिंग सुरू केली आणि दुसरी इनिंगसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात गाजवली होती.
दिलीपकुमार यांची नायक म्हणून कारकीर्द संपत असताना उदयाला आलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा “शक्ती’ चित्रपट असो किंवा नवीन पिढीतील नायक गोविंदासोबत केलेले काही चित्रपट असोत या सर्वच चित्रपटात दिलीपकुमार यांचेच अस्तित्व पडद्यावर भरून राहिले होते, हे नाकारून चालणार नाही. “शक्ती’ चित्रपटाच्या कालावधीमध्ये अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार यांच्यातील त्या जुगलबंदीची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असली आणि दोघांच्याही चाहत्यांनी आपल्या आवडत्या नायकालाच मोठे करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या चित्रपटांमध्येही दिलीपकुमार यांनी आपल्यातील अभिनय क्षमतेचे दर्शन त्या वयातही घडवले होते. 1944 मध्ये “ज्वार भाटा’ या चित्रपटापासून सुरू झालेली दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांनी इतर अभिनेत्यांच्या मानाने कमी चित्रपट केले. कारण चित्रपट निवडतानाही त्यांची नजर चोखंदळ होती. त्यांच्या समकालीन अभिनेत्यांपैकी देव आनंद यांच्या चित्रपटांची संख्या दिलीपकुमार यांच्या चित्रपटांपेक्षा खूपच अधिक आहे. पण केवळ संख्यात्मक काम न करता गुणात्मक काम करण्यावर दिलीपकुमार यांनी कायम भर दिल्याने त्यांच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होऊ लागली.
चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांची जेव्हा नोंद केली जाऊ शकते तेव्हा दिलीपकुमार यांनी अभिनय केलेल्या “मुगल-ए- आजम’, “नया दौर’ “मधुमती’ यासारख्या चित्रपटांशी नोंद होणे अपरिहार्य आहे. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे अनेक वेळा केवळ मुद्रा अभिनयाच्या जोरावर आपल्या मनातील विचार प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत कसे पोहोचवावेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे केवळ नजरेतून त्यांच्या मनात काय चालले आहे, हे त्यांच्या प्रेक्षकांना कळत असे.
प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रेमिकाची वेदना असो किंवा खट्याळ मिश्किल प्रेमिक असो किंवा अन्यायाने पेटून उठलेल्या नायकाच्या मनातील चीड असो या सर्व भावना केवळ नजरेच्या माध्यमातून दाखवण्याचे आगळेवेगळे अभिनय कौशल्य त्यांच्याकडे होते. हावभाव करणे किंवा हातवारे करणे म्हणजेच अभिनय करणे यावर विश्वास असणाऱ्या नव्या पिढीतील अनेक अभिनेत्यांनी दिलीपकुमार यांचा हा अभिनय पाहायला हवा. त्यांनी सामाजिक बांधिलकीही कायम ठेवली होती. सर्वसाधारणपणे त्या काळामध्ये कोणताही अभिनेता समाजविषयाशी निगडित राहात नव्हता. पण कोणत्याही विषयावर स्पष्टपणे भाष्य करणे दिलीपकुमार यांनी कधीही टाळले नाही. पाकिस्तान सरकारने दिलीपकुमार यांना जेव्हा त्यांचा
सर्वोच्च “निशाने पाकिस्तान” हा किताब दिला तेव्हा भारतामध्ये त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण ती टीकाही दिलीपकुमार यांनी संयमी पद्धतीने स्वीकारली. भारताच्या संसदेमध्ये राज्यसभेत सदस्य म्हणून काम करत असतानाही दिलीपकुमार यांनी अनेक विषय मार्गी लावण्याचे काम केले होते. मुंबईचे “शेरीफपद’ खरे तर केवळ नामदाखले पद आहे, पण मुंबईचे शरीफ म्हणून काम करत असतानाही अनेक महत्त्वाच्या निर्णयांना दिशा देण्याचे काम केले होते. दिलीपकुमार हे मूळचे युसूफ खान असल्याने अनेक वेळा त्यांच्यावर खालच्या पातळीवरही टीका झाली. अशा टीकेकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यामुळे या अध्यायाचा अंत झाला. या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.