पुणे -पावसाने मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांनी स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन एस.टी. स्थानकावर गर्दी केल्याने एस.टी. प्रशासनावर ताण आला आहे. या संधीचा फायदा घेऊन खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे. खासगी वाहनांनी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांकडून तब्बल 600 ते 800 रुपये घेत आहेत.
पावसामुळे मुंबईला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत. यामुळे रेल्वे स्थानकावरून प्रवासी तीन मुख्य स्थानकांवर येत आहेत. परिणामी, मुंबईला जाण्यासाठी एस.टी. गाड्यांची संख्याही अपुरी पडत असल्याने प्रवासी खासगी गाड्यांचा आधार घेत आहेत. मात्र, स्टेशन परिसर व शिवाजीनगर भागातून खासगी वाहनचालक प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत.
आमच्या कुटुंबातील चार सदस्यांना परळला (मुंबई) जाण्यासाठी रेल्वे स्टेशनबाहेरुन 2300 रुपये सांगण्यात आले. एस.टी. स्थानकात गर्दी झाल्याने खासगी वाहनांने जाण्याचे ठरवले होते. मात्र, त्यांच्याकडून लूट सुरू आहे.
– संजय ढेंबळे, प्रवासी