भोर-वेल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बांधावर जाऊन पाहणी
वेल्हे (प्रतिनिधी) – पानशेत परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. उपविभागीय अधिकारी भोर राजेंद्रकुमार जाधव यांच्या आदेशानुसार व वेल्हे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
वेल्हे तालुक्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यावर तरंगू लागली आहे, तर काही वाहून गेली आहेत. कापायला आलेली पिके पावसामुळे कापणी करणे अवघड झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरवताना बळीराजा मोठ्या आडचणीत सापडलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत.
पानशेत परिसरात मंगळवार (दि. 5) रोजी भात शेतीच्या पिकांची पानशेत मंडल अधिकारी विकास पाटील, तलाठी महेश माने, ग्रामसेवक एस घाडगे, कृषी सहाय्यक पवार, कर्मचारी स्नेहल ढेबे यांनी पाहणी करून पंचनामे केले. यावेळी सरपंच संगीता तेलावडे, यशवंत सेना अध्यक्ष शंकर ढेबे, उपाध्यक्ष अशोक मरगळे, युवक अध्यक्ष अनंता ढेबे,राहूल ठाकर, सोसायटी चेअरमन जागडे व इतर नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.