पुणे -राज्यातील कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून, शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात 39.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवल्याने यावर्षीचा उन्हाळा आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिना सहसा सौम्य थंडीचा असतो. पण, यावर्षी तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलाचा परिणाम आता दिसू लागला आहे. कधी थंडी तर कधी उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले आहे.
शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात किमान 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 39.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाने शरीराची लाहीलाही होत आहे. तर येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत आणखी उष्णता वाढणार असल्याचे मत हवामान विभागाच्या तज्ञांनी वर्तवले आहे.
शहरात 4 अंश जास्त तापमान
शहरात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रावारी शहरात 34.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शहरातील तापमान
शिवाजी नगर – 34.7
पाषाण – 35.3
लोहगाव – 35.1
चिंचवड – 36.1
लवळे – 37.6