शिरूर- लोकसभा निवडणुकीदरम्यान शिरूर तहसील प्रशासनाने वापरलेल्या 22 गाडी मालकांचे भाड्यापोटीचे 20 लाख 48 हजार रुपयेचे बिल अदा न केलेले नाही. त्यामुळे वाहन मालक व वाहनचालक हवालदिल झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाहनचालकांची बिले तातडीने द्यावीत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन शिरूर तहसील कार्यालयाला कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिरूर-आंबेगावचे तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान या गाड्या प्रशासनाने वापरले होते. या चालकांचे बिले लवकरात लवकर मिळावेत. प्रशासनाने गाड्या मालकांना मोबदला न दिल्याने ते अडचणीत आले आहेत. या गाड्या मालकांनी कर्ज घेऊन गाड्या घेतल्या आहेत. त्याची बिले तातडीने देण्यात यावी अन्यथा माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी गाड्यांचे चालक व मालक उपस्थित होते. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे प्रदेश सचिव रवींद्र घेगडे यांनी वाहनचालकांच्या व्यथा मांडल्या. दरम्यान, शिरूर, खेड तालुक्यातील 22 वाहनचालकांची अडकलेले पैसे लवकर न मिळाल्याने वाहन चालकांवर गाडीचे हप्ते भरण्यास इतर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी 11 मार्च 2019 ते 25 मे 2019 यादरम्यान शिरूर तालुक्यातील 22 स्कार्पिओ बोलेरो निवडणुकीकरिता घेतल्या होत्या. परंतु या गाड्यांचा वापर 30/ 4/ 19 पर्यंत एकूण 51 दिवस झाला.
या गाड्यांची बिल वीस लाख 48 हजार आठशे रुपये बाकी आहे. याबाबत शिरूर तहसीलदार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथील निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत आमचे पैसे मिळावे म्हणून गेलो, परंतु या सर्वांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. याबाबत शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही भेटून त्यांची पत्रे जिल्हाधिकारी पुणे यांना दिले आहेत, असे वाहनचालकांनी सांगितले.