जुन्नर – सध्या देशभरात सेंद्रिय उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कौल वाढताना दिसत आहे. कृषी विभाग सातत्याने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळण्याचे आवाहन करत आहे. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील उंडेखडक गावच्या भगवंता शंकर नांगरे या शेतकऱ्यांने कृषी सहायक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने गावठी कांदा या वाणाची लागवड केली आहे.
भगवंता नांगरे म्हणाले, आम्ही दरवर्षी रब्बी हंगामामध्ये शेतात गहू, हरभरा ही पिके घेत होतो; परंतु यावर्षी वेगळा पर्याय निवडून कृषी विभागाचे कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, बापू रोकडे व डी. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे शेतात पालेभाज्या व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड घेऊ लागलो आहे.
त्यानंतर कृषी सहायक अमोल मोरे यांनी रासायनिक पद्धतीमुळे होणारी शेती आणि त्यामुळे शारीरिक होणाऱ्या परिणामांची तसेच सेंद्रिय शेतीची आणि त्याच्या फायद्याची माहिती मला दिली. त्यानुसार आम्ही शेतात गावठी कांदा या वाणाची लागवड केली आहे. याला बाजार भावापेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला फायदा होईल.
सध्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात कांदा लागवडीचे प्रमाण वाढत आहे. नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील वातावरण कांदा लागवडीसाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिक पद्धतीकडून नगदी पिकांकडे वाढताना दिसत आहे.
-अमोल मोरे, कृषी सहायक जुन्नर
हेक्टरी 78 क्विंटल उत्पादन
नांगरे यांनी प्रथमतः सेंद्रिय शेती पद्धतीने भाताच्या लागवडीला सुरूवात केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पीक स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यामध्ये नांगरे यांना 78 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळाले आहे. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता ते सेंद्रिय पद्धतीने भात या पिकाचे चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते शेतात सेंद्रिय पध्दतीने भात लागवड करत आहेत. घरामध्ये 5 – 6 म्हशी आहेत तसेच शेळ्या असल्यामुळे शेणखत व लेंडी खताचा ते शेतात वापर करतात. त्यांनी पारंपरिक पद्धतीकडून आधुनिक शेतीपद्धतीकडे एक पाऊल टाकले आहे. शेती आधुनिक पद्धतीने केल्यास नक्कीच किफायतशीर होईल, असे ते सांगतात.