चंद्रपूर – कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळशाची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात तत्काळ चौकशी करावी, असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बरांज खुली कोळसा खाण संदर्भात कामगारांच्या समस्या तसेच बरांज गावातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, बरांज खुली कोळसा खाणीतील साडेचार लाख टन कोळसा 2018 पूर्वी बेपत्ता झाला आहे.
हा कोळसा जाळण्यात आला असेल तर त्याची राख लोकांच्या नजरेस पडायला पाहिजे होती. तसेच स्थानिकांना याबाबत माहिती असती. मात्र याबाबत सर्व जण अनभिज्ञ असून यात मोठे गौडबंगाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बरांजचा कोळसा अवैधरित्या उचलण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले.