कराड – विरोधकांना घटना, लोकशाही मान्य नाही. त्यामुळे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू ससून त्यांना स्वातंत्र्यापूर्वीची समाजव्यवस्था आणायची आहे. सत्तेसाठी त्यांनी सेनेला फसवले. त्यामुळे राज्याला जातीयवादापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी गठित करण्यात आली. सरकार पाडण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, पुढील अडीच वर्षे हेच सरकार राहणार असून यापुढेही पाच वर्ष महाविकास आघाडीच सत्तेत राहणार आहे. विरोधकांना त्याची झलक कोल्हापुरात दाखवून दिली असून हिमालयात जाणाऱ्यांचे काय झाले? हेही बघायला हवे, अशी कोपरखळीही त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना नाव न घेता मारली.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सातारा जिल्हा कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील-उंडाळकर, इंद्रजीत गुजर, मनोहर शिंदे, कल्पना जाधव, मंगला गलांडे, विद्याताई थोरवडे आदींची उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. अवाढव्य करवाढ करून जनतेची लूट चालवली आहे. त्यामुळे देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास विशेष वाटायला नको. एखाद्या कुटुंबाची काही मान-मर्यादा असते. परंतु, मोदींनी देशाच्या अनेक संस्था विकून एकप्रकारे मनी-मंगळसूत्र विकून त्यांच्यावर देश चालवण्याची वेळ आली आहे. 1994 मध्ये ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण दिले. ते आज संपुष्टात आले. ते कोणामुळे हेही सर्वज्ञात असून राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कटगुणमधील महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मैत्री वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. कराडच्या भूमीला महाराष्ट्र घडविण्याचा आणि देशही वाचवण्याचा इतिहास आहे. याच भूमिका हा मेळावा होत असून ओबीसींच्या न्याय-हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी आहे. लवकरच पुण्यामध्ये भव्य मेळावा घेणार आहे. सध्या अनेक भोंगा वाजवणारे तयार झाले असून लोकांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. धर्माच्या-जातीच्या नावाखाली ओबीसींचा वापर होत आहे. अशा गोष्टीला ओबीसी बांधवांनी बळी न पडता त्यांनाच धडा शिकवण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
मी ओबीसींचे आरक्षण 19 टक्के केले, सध्या ते रद्द झाले असून त्यांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आतापर्यंत ओबीसींचा वापर व शोषण झाले. मात्र, ओबीसींसाठी महात्मा जोतिबा फुले घरकुल योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींच्या कर्ज वसुलीला स्थगिती देत असून त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. तसेच ओबीसी महिलांसाठी सातारा जिल्ह्यात क्लस्टर उभारणीसाठी 15 कोटी देणार असून त्यासाठी बाबांनी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच कटगुणमध्ये महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी 25 कोटी निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. भानुदास माळी प्रास्ताविक केले. दरम्यान, ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.